Prakash Ambedkar On Thackeray Group : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक नेत्यांचे सध्या राज्यभरातील विविध मतदारसंघात दौरे सुरु आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीसह आदी पक्षांच्या ठिकठिकाणी सभा आणि मेळावे सुरु आहेत. यातच विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपासंदर्भातही चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं. शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत किती जागा मिळतील? याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. तसेच आमच्या आघाडीचे भारतीय जनता पार्टी सोडून सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी काँग्रेस असं ठरवतं आहे की, आपण १५० जागांच्या खाली यायचं नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी असं ठरवलं आहे की, ८८ जागांच्या खाली यायचं नाही. त्यामुळे आपण जर या दोन्ही पक्षाच्या जागांच्या मागणीचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील. एवढ्या जागा ठाकरे गटाला सोडायला ते तयार असल्याची परिस्थीत आहे. त्यामुळे आता हा फॉर्म्युला समोर येत असल्यामुळे यावरून आणखी राजकारण होईल. मला काही ओबीसींच्या नेत्यांनी सांगितलं की, सर्वात मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर असणार आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आमचे दरवाजे भाजपासोडून सर्वांसाठी खुले’

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी शिवसेना ठाकरे गटाबरोबर जाणार का? किंवा अजून कोणाबरोबर युती करणार का? याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, “आम्ही कोणाबरोबर जाणार आहोत, हे आम्ही सांगितलेलं आहे. आदिवासींचं संघटन होत आहे, त्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी जात आहे. विविध जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या काही संघटना आहेत. त्यांना बरोबर घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या आघाडीमध्ये ज्याला कोणाला यायचं असेल त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. मात्र, ही आघाडी कोणाकडे जाणार नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी तुमचे दरवाजे खुले आहेत का? असं विचारलं असता ते म्हणाले, “आमचे दरवाजे भारतीय जनता पक्ष सोडून बाकी कोणासाठीही खुले आहेत.”