अलिबाग- पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणारा वंरध घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीसाठी बंदी असणार आहे. प्रवाश्यांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. घ
सुरक्षिततेच्या कारणासाठी पुणे जिल्ह्यातील भोर येथून रायगड जिल्ह्यातील महाडला येणारा वरंध घाट आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, मालवाहतूक करणारे ट्रक, हलकी वाहने यांना बसणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून दुरुस्त करण्यात आला होता. पावसाळ्यात वाहतुकीसाठी असुरक्षितच असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात या घाटामध्ये दरडी पडणे, माती वाहून येणे, रस्ता खचणे असे प्रकार झाले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागामार्फत या मार्गाची कोट्यवधी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात प्रवासासाठी हा मार्ग धोकादायक असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय महामार्ग विभागाने काढला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. त्यानुसार प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या कारणांसाठी वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीत प्रवाश्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केली आहे.
कोकणातून पुण्याकडे जाण्यासाठी महाड, माणगाव, ताम्हिणी घाट, मुळशी, पुणे या मार्गाचा आणि कोल्हापूरकडे जाण्यासाठी पोलादपूर, खेड, चिपळूण, पाटण, कराड, कोल्हापूर या पर्यायी रस्त्याचा वापर करावा.