Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. एकेकाळी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आता मात्र त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरावती येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना आंबडेकर यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणावर भाष्य केले. “आता धस (आमदार सुरेश धस) विरुद्ध जरांगे पाटील असे सुरू झाले आहे का? की हे दुसरे काही आहे?, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. “भाजपाला पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी शेतकरी जसा दोषी आहे, तसे मनोज जरांगे पाटीलही दोषी आहेत. जे तुम्हाला मान्य करत नव्हते, त्यानांच मनोज जरांगेंनी सत्तेवर बसवले”, असाही आरोप आंबेडकर यांनी केला.

“मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. पण त्यांनी भाजपाला कधी लक्ष्य केले नाही. भाजपा एकेकाळी मनोज जरांगेंना मान्यता द्यायला तयार नव्हते, तरीही त्यानांच तुम्ही सत्तेवर बसवले”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा जिल्ह्यातून मोर्चे निघत आहेत. तसेच या मोर्चात परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशीही मागणी केली जात आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण एकदा मागण्या केल्यानंतर कारवाईची सुरुवात झाल्यानंतर मागण्या मान्य होईपर्यंत थांबायला हवे. ज्यावेळेस प्रसंग घडला त्यावेळेस काहीच केले नाही. पण नंतर मोर्चे वैगरे काढणे योग्य नाही. संतोष देशमुख आणि सुर्यवंशी ही दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी मूर्ख आहेत

तसेच कर्जमाफी विषयावर बोलत असताना प्रकाश आंबडेकर यांनी शेतकऱ्यांना मूर्ख असल्याचे संबोधले. ते म्हणाले, या सरकारने, आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याज माफीचे आश्वासने दिली होती. साता बारा कोरा करण्याची भाषा वापरली गेली. मी शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो, कारण त्यांनी सत्तेवर पुन्हा कुणाला बसवले? मग आता पुन्हा रडत बसण्याचे कारण काय? शेतामध्ये जे पेरता तेच उगवते, तसेच कर्ज माफी करणार नाही, असे म्हणणारे सरकार तुम्ही निवडून दिले. ते आता कर्जमाफी देणार नसतील तर त्यात नवीन काय?