अहिल्यानगर : राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने विरोधकांचा पूर्ण धुव्वा उडवत सर्व २१ जागांवर विजय संपादन केला. त्यामुळे कारखाना पुन्हा तनपुरे यांच्या वर्चस्वाखाली आला आहे. अरुण तनपुरे व हर्ष तनपुरे हे दोघे पिता-पुत्र विजयी झाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा असलेल्या राजू शेटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ व अमृत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली कारखाना बचाव समिती या विरोधी दोन्ही मंडळांना एकही जागा मिळवता आली नाही. काल, शनिवारी १२ हजार ६६२ मतदारांनी (६० टक्के) मतदान केले होते. त्यानंतर आज, रविवारी मतमोजणी झाली.
जनसेवा पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण मतदारसंघ- कोल्हार गट- अशोक उऱ्हे (७३२९), ज्ञानेश्वर कोळसे (६९०९), देवळाली प्रवरा गट- अरुण ढूस (६८७४), कृष्णा मुसमाडे (६७४७), भारत वारुळे (६५५४), टाकळीमिया गट- मीना करपे (७२३७), ज्ञानेश्वर खुळे (७०८१), ज्ञानेश्वर पवार (६२१५), आरडगाव गट- प्रमोद तारडे (६९८३), वैशाली तारडे (६७११), सुनील मोरे (६७८६), वांबोरी गट- किसन जवरे (७४२४), भास्कर ढोकणे (७३३३), राहुरी गट- अरुण तनपुरे (६९४७), जनार्दन गाडे (६६७४), अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ- अरुण ठोकळे (७२३६), महिला मतदारसंघ- सपना भुजाडी (६७८६), जनाबाई सोनवणे (६५६५), इतर मागासवर्ग मतदारसंघ- रावसाहेब तनपुरे (७१३७), भटक्यात विमुक्त जाती मतदारसंघ- अशोक तमनर (७५८७) व ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघ- हर्ष तनपुरे (१२८).
जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी अडीच ते तीन हजारावर मताधिक्य मिळवले. दुसऱ्या क्रमांकावरील मते शेतकरी विकास मंडळास व तिसऱ्या क्रमांकावर कारखाना बचाव कृती समिती राहिली. पहिल्या फेरीपासूनच जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळू लागले होते. त्यामुळे मतमोजणीस्थळी कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच गुलाल उधळत जल्लोष सुरू केला. निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार नामदेव पाटील यांनी कामकाज पाहिले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या फलकाचा वापर
कारखान्याची यापूर्वीची सत्ता माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे होती. त्यांनी यंदाच्या निवडणुकीत कोणालाही पाठिंबा दिला नाही किंवा कोणालाही विरोध नसल्याचे सांगितले होते. आमदार शिवाजी कर्डिले तटस्थ होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठे फलक लावून शेतकरी विकास मंडळाने सरकार आपल्या पाठीशी असल्याचा प्रचार केला होता. मात्र प्रत्यक्षात सभासद मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही फोटो वापरले. जनसेवाचे अरुण तनपुरे यांनी लवकरच गोड बातमी मिळेल, असे जाहीर केल्याने मतदारांनी त्यांना पाठिंबा देत विजयी केले.
कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आव्हान
कारखाना गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. त्याचबरोबर कर्जाच्या विळख्यात सापडल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेने जप्तही केला आहे. कामगारांची व वित्तीय संस्थांची देणीही थकली आहेत. न्यायालयाच्या आदेशाने कारखान्याची निवडणूक झाली असली तरी कारखाना पुन्हा सुरू करण्याचे मोठे आव्हान तनपुरे कुटुंबीयांना पुन्हा पेलावे लागणार आहे.