मावळते आमदार विनायक मेटे, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर यांना उमेदवारी नाकारत भाजपाने बुधवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली. भाजपाने जारी केलेल्या या उमेदवारांच्या यादीमध्ये मेटे आणि खोत यांची नावं नसल्याने भाजपाच्या या दोन्ही मित्रपक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. असं असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक शब्दांमध्ये यावरुन मेटे आणि खोत यांना लक्ष्य केलंय.

नक्की वाचा >> “मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की…”; शिवसेनेचा भाजपाच्या भूमिकेवरुन प्रश्न

भाजपाने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या पाच जणांची उमेदवारी जाहीर केली. पक्षाने उमेदवारी देताना मराठा, धनगर, ब्राह्मण, ओबीसी हे जातींचे समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यामधून भाजपाचे सहकारी असणाऱ्या मेटे आणि खोत यांना वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच मिटकरींनी या दोन्ही नेत्यांची नावं यादीत नसल्याने उपहासात्मक वक्तव्य केलंय.

 “त्यांना राजकीय आत्महत्याच करावी लागलीय. भावी उत्तरायुष्यात त्यांचं आयुष्यमान वाढो. त्यांना चांगलं आरोग्य लाभो. लढत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असं मिटकरींनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये खोत आणि मेटे यांचा उल्लेख करत म्हटलंय. तसेच पुढे बोलताना, “मात्र अशा वाटेवर तुम्हाला फडणवीस इतकं मोकाट सोडतील याची दुरान्वये कल्पना नव्हती. मला तर फार दु:ख झालं आहे. पुढील दोन-तीन दिवस तर मी काही जेवणार नाही. कारण मेटे आणि सदाभाऊ सभागृहात नसले तर सभागृह अगदी खाली झालं आहे,” असं उपाहात्मक वक्तव्यही मिटकरी यांनी या व्हिडीओमध्ये केलंय.

नक्की वाचा >> विधान परिषद निवडणूक : “पंकजा मुडेंचा पत्ता कट करणं हे फडणवीसांचं षड्यंत्र”

“महाराष्ट्राचे कैवारी आता थांबलेत. नव्हे तर महाराष्ट्र थांबलाय. आगामी काळात महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम जे फडणवीसांनी (दोघांना उमेदवारी नाकारुन) थांबवलंय त्याचा हिशेब त्यांना चुकता करावा लागेल. खोत आणि मेटेंवर झालेला अन्याय महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही,” असंही मिटकरी पुढे बोलताना म्हणालेत.

या ट्विटपूर्वीच अन्य एका ट्विटमधून मिटकरींनी, “सर्वसामान्यांचे कैवारी विनायकराव मेटे, केशव उपाध्ये, विनोद तावडे आणि सदाभाऊ खोत यांच्यावर झालेला अन्याय आम्ही कदापी सहन करु शकत नाही. त्यांच्या या अतीव दुःखात आम्ही सहभागी आहोत. आई भवानी त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो”, असं म्हणत मेटे आणि खोत यांना टोला लगावला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बुधवारी भाजपाने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेने जाहीर नाराजी व्यक्त केली. लवकरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन याबाबत कळवणार आहोत. त्यानंतर शिवसंग्राम आपली भूमिका ठरवेल, अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली. “भाजपा सत्तेत असताना सर्व मित्रपक्षांना मंत्रिपदं मिळालं. फक्त शिवसंग्रामला मंत्रिपद दिलं गेलं नाही. तेव्हा शिवसंग्रामवर अन्याय झाला अशी भावना कार्यकर्त्यांची होती. त्यानंतर महामंडळाच्या बाबतीतही असंच झालं. अशा अनेक बाबतीत आमच्यावर अन्याय झाला. विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी आम्हाला शब्द देण्यात आला होता. मात्र तो पाळला गेला नाही. याच कारणामुळे आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आम्ही भेट घेणार आहेत,” असे विनायक मेटे म्हणाले.