काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्तेबाबत नुकताच एक मोठा दावा केला होता. राज्याच्या मुख्य खुर्चीवरील (मुख्यमंत्रीपद) व्यक्ती बदलेल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, “येत्या १५ ते २० दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतात ते जनता बघेल. यात मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होणार आहे. पुढचा सप्टेंबर हा महिना या राज्यातल्या सत्ताबदलाचा असेल.”
दरम्यान, वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून, भारतीय जनता पार्टीकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते पदावर बसले आहे. या पदावर बसल्यावर प्रत्येकाला विरोधात बोलावं लागतं. वडेट्टीवार तीच भाषा बोलत आहेत. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवारांचा दावा फेटाळला आणि ते म्हणाले, एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील.
दरम्यान, या वक्तव्यांना विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे. वडेट्टीवार यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी ते म्हणाले, बावनकुळेंना काहीच माहिती नाही. बावनकुळे बोलत असतील तर त्यावर अजिबात विश्वास नाही. माझ्या सूत्रांनी मला माहिती दिली आहे. राज्यातल्या सत्तेत बदल होईल. एकूणच ज्या पद्धतीने हे सरकार चाललं आहे त्यावरून सर्वगोष्टी स्पष्ट आहेत.
हे ही वाचा >> “त्या कंडक्टरला लोळंस्तोवर मारेन”, एसटी आगार प्रमुखांना आमदार संतोष बांगरांची धमकी; म्हणाले, “पायाखाली…”
विजय वडेट्टीवार म्हणाले, ज्यांना मुख्यमंत्री केलंय त्यांना काम करु दिलं जात नाही आणि जे मुख्यमंत्री होणार होते ते अर्धे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या अर्ध्यातला अर्धा हिस्सा काढून घेतला. त्यामुळे १०५ आमदार असूनही सत्तेतला पाव हिस्सा मिळणार असेल तर ही मंडळी काय स्वस्थ बसणारी आहे का? माझ्याकडे सूत्रांची माहिती आहे. मी विश्वासाने सांगतोय, की हे सरकार आहे तोवर बावनकुळे यांना असं बोलावंच लागणार आहे. परंतु, माझ्या सूत्रांनी १०० टक्के सांगितलं आहे की राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात सुरू आहेत.