उत्तर महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना मराठवाडा मात्र अजूनही दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण भरत आले आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा देण्यासाठी आता जायकवाडीचे दोन दरवाजे अर्धा फूटांनी गुरूवारी उघडण्यात आले. एक हजार ४७ क्यसेक (एक क्युसेक म्हणजे २८.३१ लिटर) वेगाने गोदावरीत पाणी सोडण्यात येत आहे.
राज्याच्या विविध भागांत मुसळधार हजेरी लावणाऱ्या पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. पावसाळा संपत आला तरी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच धरण तळाशी गेले आहे. त्यात नाशिक, नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीत पाणी आल्याने औरंगाबाद, जालना, परभणीसह काही जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. नाशिक, नगरकडून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी भरत आले आहे. नाथसागरात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील तहानलेल्या गावांना पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्याची अमलबजावणी गुरूवारी करण्यात आली.
पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी जलसंधारण मंत्री बबनराव लोणीकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पाणी सोडण्यासंदर्भात गोदावरी काठावरील गावांमध्ये पूर्वनियोजन करण्याची सूचना जायकवाडी पाटबंधारे विभागाने औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी येथील जिल्हाधिकाऱ्यांना १२ ऑगस्ट २०१९ रोजी दिली होती. १५ ऑगस्ट रोजी दुपारी पाटबंधारे विभागाने जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून एक हजार ४७ क्यसेक (एक क्युसेक म्हणजे २८.३१ लिटर) वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.