Supriya Sule On Sharad Pawar and Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांचं कारण म्हणजे मागील काही दिवसांत अनेकवेळा शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर त्यांच्यात अनेकदा संवाद झाल्याचंही पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार हे पुण्यातील साखर संकुलातील बैठकीत देखील एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशा चर्चांनी आणखी जोर धरला आहे.
यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक सूचक भाष्य केलं. पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? यावर मोठं भाष्य केलं आहे. ‘हा माझा निर्णय नाही, जो पक्षाचा निर्णय असेल तो निर्णय पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेईल’, असं सूचक भाष्य सुप्रिया सुळे यांनी केलं.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याबाबत तुमची भूमिका काय आहे? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हा माझा निर्णय नाही, मी आता कुठे जाणार, इंदापूरला आधी जाणार की दौंडला आधी जाणार. त्यामुळे हा पक्षाचा निर्णय आहे. कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातच शरद पवार यांच्या कामांची पद्धत तुम्ही सर्वांनी सहा दशकं पाहिलेली आहे. शरद पवार जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं. त्यामुळे जो पक्षाचा निर्णय असेल तो निर्णय पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेईल. आम्ही कोणताही निर्णय वैयक्तिक घेत नाहीत”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलताना अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले की, “पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात”, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? भविष्यात काही वेगळं चित्र दिसेल का? असं काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले होते की, “माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सर्वजण (शरद पवार, सुप्रिया सुळे) आले होते. घरातील कार्यक्रम असतील तर आम्ही जातोच, एकत्र येतोच. आमची विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी बाकीच्या बाबतीत कुटुंब म्हणून जिथे कुठे सुख आणि दु:खामध्ये आपण नेहमी एकमेकांच्या बरोबर असतो”, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.
शरद पवारांनी दिली होती तीन शब्दांत प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादी (शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी) काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत ३१ मे रोजी पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “मला माहिती नाही.”