ऐश्वर्या राय-बच्चनचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन घडवून आणणारा चित्रपट म्हणून संजय गुप्ताच्या ‘जजबा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाबद्दल मौन धारण करून असलेल्या संजय गुप्ताने ऐश्वर्या आणि ‘जजबा’ चित्रपटाचे एकेक पत्ते हळूहळू उलगडायला सुरुवात केली आहे. ऐश्वर्याबरोबर या चित्रपटात जॉन अब्राहम काम करणार असल्याचे गुप्ताने जाहीर केले होते. मात्र, जॉनची चित्रपटातील भूमिका छोटी असल्याने तो ऐश्वर्याचा नायक नाही हे निश्चित झाले होते. आता ऐश्वर्याने स्वत:च या चित्रपटासाठी नायक म्हणून इरफान खानची निवड केली आहे.
‘जजबा’ हा ऐश्वर्यासाठी खरोखरच महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक बारीक सारीक तपशीलावर ती लक्ष ठेवून आहे. ‘जजबा’ची कथा खरेतर अभिषेकला आवडली होती. हॉलिवूडच्या एका चित्रपटाचा हा रिमेक आहे. मात्र, त्या हॉलिवूडपटाचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. अभिषेकने संजय गुप्ताला या चित्रपटातील कलाकारांविषयी विचारणा केली. संजय गुप्ताने आपण ऐश्वर्याचा विचार करत असल्याचे सांगितल्यावर आठवडय़ाभरात अभिषेकने ऐश्वर्या चित्रपटासाठी तयार असल्याचा निर्णय कळवला. या चित्रपटाची पटकथा आपण ऐश्वर्याला ऐकवली होती. तिच्या मुख्य भूमिकेबरोबरच नायक म्हणून जॉन अब्राहम आणि इरफान खान अशा दोन अभिनेत्यांची नावे संजय गुप्ताने तिच्यासमोर ठेवली होती. ऐश्वर्याने इरफानच्या नावाला पसंती दिली आहे. या चित्रपटात एकूण चार प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. ऐश्वर्या यात वकिलाच्या भूमिकेत असणार आहे तर इरफान निलंबित केलेल्या पोलिसाच्या भूमिकेत. ऐश्वर्याने याआधी कधीच इरफानबरोबर काम केलेले नाही. मात्र, इरफान खूपच चांगला अभिनेता असल्याने तिने या भूमिकेसाठी त्याला पसंती दिल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. चित्रपटात इरफान आणि ऐश्वर्या प्रेमी जोडप्याच्या भूमिकेत दिसणार नाहीत. मात्र, त्यांच्या व्यक्तिरेखांची गुंफण अशापध्दतीने करण्यात आली आहे की हे दोघेही एकत्र येतील, अशी अपेक्षा प्रेक्षकांना कायम वाटत राहील. आता आणखी एका अभिनेत्रीची निवड बाकी असून ती झाल्यानंतर चित्रिकरणाला सुरूवात करण्यात येईल, असे संजय गुप्तांनी सांगितले.