राज्यात करोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. दरम्यान, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या लसीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“जेव्हा भारत पोलिओ मुक्त झाला तो क्षण आपल्यासाठी गौरवशाली होता. असाच काहीसा अनुभव आपल्याला पुन्हा एकदा येणार आहे. यावेळी भारत करोनामुक्त होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी शुभेच्छा. जय हिंद.” अशा आशयाचं ट्विट करुन बिग बींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवसभरातील लसीकरणाची आकडेवारी

सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) : अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलढाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७०), सांगली (४५६), सिंधुदूर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०).