प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मुलांच्याबाबतीत कमालीचा जागरूक आहे. त्यांना माध्यमांपासून दूर ठेवत त्यांच्या सहज सुंदर जीवनाची तो काळजी वाहतो. अलिकडे अक्षयचा हॉलिडे चित्रपट प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे अक्षयच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. पत्नी टि्ंवकल मुलगा आरव आणि छोटी नितारा कमालीचे खूष आहेत. मुलांना जाणिवपूर्वक माध्यमांपासून दूर ठेवतोस का? या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देत तो म्हणाला, माझ्या मते मुलांना वृत्तपत्र आणि तत्सम माध्यामांच्या प्रकाशझोतापासून दूर ठोवणे नेहमीच चांगले असते. माझ्या मुलांनी सर्वसामान्य जीवन जगावे, अशी माझी इच्छा आहे. तो पुढे म्हणाला, मुलांना मोठे होताना पाहण्यासारखा आनंद नाही. वडिलांसाठी हा सर्वात मोठा आनंद असतो. पूर्वी मी चित्रीकरण संपल्यावर उशिराने घरी येत असे. परंतु, आता घरी मुले असल्यामुळे लवकर काम संपवून घरी जाण्याची ओढ लागलेली असते. मुलांबरोबर वेळ घालवण्यात मजा येते, त्यांचे लडीवाळ वागणे कामाचा सर्व ताण नाहीसा करतात. हा आनंद अनमोल आहे.