बॉलिवूडचं ‘खान’दान अर्थात शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांचे चित्रपट जेव्हा मोठ्या पडद्यावर येतात, तेव्हा उत्सुकतेसोबतच चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरणार याची खात्री त्यांना मनात कुठेतरी असते. पण गेल्या काही महिन्यांत याउलटच चित्र पाहायला मिळालं. शाहरुखचा ‘जब हॅरी मेट सेजल’, सलमानचा ‘ट्युबलाइट’, आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ यांसारखे चित्रपट दणक्यात आपटले. तर दुसरीकडे विकी कौशल, राजकुमार राव, आयुषमान खुराना या नव्या दम्याच्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरू लागले. कदाचित म्हणूनच बॉलिवूडच्या किंग खानला आगामी चित्रपट ‘झिरो’विषयी चिंता वाटू लागली आहे. जर हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप झाला तर पुढील सहा ते दहा महिने मला काम मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया शाहरुखने दिली आहे.

‘चित्रपटाचं भविष्य मी बदलू शकत नाही, त्यामुळे मी का त्याचा विचार करू? ‘झिरो’ जर हिट ठरला नाही तर कदाचित मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही. पण जर मला माझ्या अभिनयावर आणि कलेवर विश्वास असेल तर पुढे काम मिळत राहील,’ असं तो म्हणाला.

वाचा : शाहरुखच्या ‘झिरो’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

शाहरुखचा ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाचा बजेट ९० कोटी रुपये इतका होता. पण बॉक्स ऑफीसवर चित्रपटाने जेमतेम ६४.३३ कोटी रुपये कमावले होते. ‘फॅन’, ‘रईस’ आणि ‘दिलवाले’ या चित्रपटांनीही अपेक्षेपेक्षा कमीच गल्ला जमवला. आता ‘झिरो’ कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.