माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या शोमध्ये मंगळवारी छत्तीसगढ येथील अंकिता या हॉटसीटवर बसल्या होत्या. पण २५ लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर न आल्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागला. त्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का?

अंकिता यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. त्यावेळी त्यांच्या सगळ्या लाइफलाइनदेखील संपल्या होत्या. त्यानंतर २५ लाख रुपयांसाठी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागला होता.

भारतात एफ-१६ फायटर विमान उडवणारे पहिले नागरिक कोण होते? असा प्रश्न बिग बींनी विचारला होता. या प्रश्नासाठी अंकिताला A.जेआरडी टाटा, B.रतन टाटा, C.राजीव गांधी आणि D.राजेश पायलट हे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अंकिता बराच वेळ विचार करत होत्या. पण योग्य उत्तर माहिती नसल्याने अंकिता यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

खेळ सोडण्यापूर्वी प्रत्येक स्पर्धकाला प्रश्नाचे उत्तर हे द्यावेच लागते. त्यावेळी अंकिताने पर्याय B रतन टाटा असे उत्तर दिले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी B पर्याय लॉक केला आणि या प्रश्नाचे उत्तर B रतन टाटा हे योग्य आहे असे त्यांनी सांगितले. पण गेम सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे अंकिताला १२ लाख ५० हजार रुपये घेऊन घरी जावे लागले.