लॉकडाउनच्या काळात घरी बसलेल्यांच्या मनोरंजनासाठी ‘रामायण’, ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिका पुन्हा सुरू करण्यात आल्या. याचसोबत मुकेश खन्ना यांची ‘शक्तिमान’ ही लोकप्रिय मालिकासुद्धा पुन्हा प्रक्षेपित करण्यात येत आहे. यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला टोमणा मारला. ‘सोनाक्षीसारख्या लोकांनी रामायण ही मालिका पाहावी. त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं आहे’, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. सोनाक्षीने गेल्या वर्षी ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिला ‘रामायण’बाबत एक साधा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्याचं उत्तर तिला देता आलं नाही. त्यावेळी सोनाक्षी सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाली होती.

मुकेश खन्ना म्हणाले, “रामायण आणि महाभारत या मालिकांचं पुनर्प्रक्षेपण अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, ज्यांनी याआधी ते पाहिलंच नाही. सोनाक्षी सिन्हासारख्या लोकांनी, ज्यांना हनुमान यांनी कोणासाठी संजीवनी आणली हेसुद्धा माहीत नाही, त्यांनी ही मालिका पाहावी.”

‘सीआयडी’ पुन्हा येतेय; जाणून घ्या कलाकारांना किती मिळायचे मानधन?

या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी एकता कपूरवरसुद्धा निशाणा साधला. एकता कपूरच्या ‘महाभारत’ मालिकेत इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. हे अजिबात योग्य नाही, असं ते म्हणाले. सध्याच्या काळातील मालिकांवर टिप्पणी करत ते पुढे म्हणाले, “सध्याची पिढी ही सासू-सुनेच्या मालिका, टिकटॉक व्हिडीओ यांमध्येच गुंतलेली आहे. अशा मालिकांसाठी त्यांनी वेळ द्यायला हवा. तर त्यांना भारताच्या संस्कृतीची जाणीव होईल.”