‘बालिका वधू’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने २०१६ मध्ये जगाचा निरोप घेतला होता. आत्महत्या करत तिने आपलं आयुष्य संपवलं होतं. या घटनेला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र तिच्या स्मृतिदिनासाठी लॉकडाउनमुळे फुलं देखील उपलब्ध होत नसल्याची खंत प्रत्युषाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले प्रत्युषाचे वडिल?

“प्रत्युषाने जगाचा निरोप घेऊन आज चार वर्षे पुर्ण झाली आहेत. आम्हाला तिची दररोज आठवण येते. मात्र आज तिच्या फोटोसमोर ठेवायला फुलं देखील उपलब्ध होत नाही आहेत. खर तर, लॉकडाउनमुळे घराजवळील फुलांची सर्व दुकान बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्युषाच्या फोटोजवळ आम्ही फुलं ठेवलेली नाहीत.” अशी खंत तिच्या वडिलांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

अभिनेता राहुल राज सिंहवर प्रत्युषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप होते. तो प्रत्युषाचा बॉयफ्रेंड होता. आत्महत्या केल्यानंतर तिला सर्वप्रथम पाहणाऱ्यांपैकी राहुल हा एक होता. तिने लिहीलेली चिठ्ठी आणि पुरावे राहुलने नष्ट केले असावे, अशी शक्यता त्यावेळी पोलिसांकडून वर्तविण्यात आली होती. यासाठी त्याच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. मात्र सबळ पुराव्यांच्या अभावी राहूलची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.