दिवाळी सणाची चाहूल लागली की फराळासोबतच लहानग्यांची किल्ला बनवण्याची लगबग सुरु होते. मग त्यासाठी लागणारं साहित्य गोळा करणं, किल्याची प्रतिकृती कशी बनवायची इथपासून प्लॅन रंगायला लागतात. काळानुरुप याचं रुप जरी बदललं असलं तरी उत्साह मात्र तोच आहे. महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक ठेवा जपण्याच्या हेतूने ‘आई कुठे काय करते’ मालिकेतही अभिषेक, यश आणि इशाने मिळून किल्ला तयार केला. स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगून गड किल्यांची स्थापना केलेल्या शिवरायांचा हा सुवर्ण इतिहास नव्या पीढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मालिकेत हा खास सीन दाखवण्यात आला. यानिमित्ताने बालपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्याची भावना यशची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक देशमुखने व्यक्त केली. "किल्ला बनवण्यासाठी वयाचं बंधन नसतं ही गोष्ट मला सीनच्या निमित्ताने उमगली त्यामुळे आता मी दरवर्षी माझ्या घरी किल्ला बनवणार", अशी प्रतिज्ञाच अभिषेकने केली. यासोबत हा किल्ला उभारण्यासाठी मदत करणाऱ्या आर्ट डायरेक्शन टीममधील प्रदीप लेले आणि श्रीनिवास काकेरा यांचे आभार मानायलाही तो विसरला नाही. आणखी वाचा : हेमांगी कवीचं मुंबईत ‘घरकुल’; ‘म्हाडा’मध्ये सलग आठ वर्षे प्रयत्न केल्यानंतर लागली लॉटरी अभिषेकची भूमिका साकारणारा निरंजन कुलकर्णी दरवर्षी आपल्या घरी किल्ला बनवतो. गेल्या ३० वर्षांपासूनची ही परंपरा त्याने अखंड ठेवली आहे. यंदाही त्याने त्याच्या घरी कुटुंबासोबत किल्ला बनवला. त्यामुळेच आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर किल्ला बनवताना त्याला फार अवघड गेलं नाही. मालिकेचे दिग्दर्शक रवी करमरकर यांनी किल्याचं महत्त्व सांगणारा खास संवाद निरंजनला दिला होता. हा संपूर्ण सीन साकारताना मी भारावून गेलो होतो अशी भावना निरंजनने व्यक्त केली.