कथा - चित्रपटाची कथा गुड्डू (अजय देवगण), पिंटू ( मनोज पाहवा) आणि जॉनी( संजय मिश्रा) यांच्या भोवती फिरताना दिसते. एकेदिवशी पिंटूला अचानकपणे कोट्यावधी रुपये मिळतात. पैसे मिळाल्यानंतर तो गुड्डू आणि जॉन यांची दिशाभूल करुन पैशासह पळ काढतो आणि सुरक्षित ठिकाणी ते दडवून ठेवतो. मात्र गुड्डू आणि जॉन पिंटूचा शोध घेतात. तोपर्यंत या पैशाविषयीचं गुपित अविनाश ( अनिल कपूर), बिंदू (माधुरी दीक्षित),लल्लन (रितेश देशमुख), झिंगुर (पितोबश त्रिपाठी), आदित्य (अर्शद वारसी) आणि मानव (जावेद जाफरी) यांना समजतं. त्यानंतर हे पैसे मिळविण्यासाठी या साऱ्यांची चढाओढ सुरु होते आणि त्यातून घडते या साऱ्यांची 'टोटल धमाल'. रिव्ह्यु - इंद्रकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काही अंशी यशस्वी ठरला आहे. अजय देवगणने वठविलेली भूमिका पाहता धमाल फ्रेंचाइजीच्या 'धमाल'मधील संजय दत्तची आठवण आल्याशिवाय राहत नाहीत. त्यातच अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या जोडीने त्यांच्या धमाल केमिस्टीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच रितेश, संजय मिश्रा, जावेद जाफरी, अर्शद वारसी यांनीही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने केलला आयटम डान्सही पाहण्यासारखा ठरला आहे. चित्रपटामध्ये लाईट, साऊंड यांचा योग्यरित्या वापर करण्यात आला आहे. प्रेक्षकांना हसवत असताना कोठेतरी हा चित्रपट मध्येच कंटाळवाणा देखील झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचं सरासरी मनोरंजन करताना दिसून येतो. मात्र धमाल फ्रेंचाइजीच्या पहिल्या दोन चित्रपटांच्या तुलनेपेक्षा टोटल धमाल म्हणावं तसं प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे हा चित्रपट एखाद दोन वेळा पाहण्यासारखा आहे.