छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली आणि अफाट लोकप्रियता मिळविलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी राणाने तुरुंगातून पळ काढला होता. पुरावे शोधण्यासाठी आणि पोलिसांपासून लपण्यासाठी तो प्रयत्न करत होता. राणाने शरण जावं आणि त्यामुळे रितसर कोर्ट कचेरीने प्रश्न मार्गी लागतील असं अंजलीला वाटतंय. यावरून दोघांमध्ये वाद सुरू आहेत.

मामा, माधुरी, पप्या अंजलीसमोर असं चित्र उभं करत आहेत की अंजलीलासुद्धा राणा चुकीचं वागत असल्याचं पटू लागलंय. अशातच राणा एका बेसावध क्षणी पकडला जातो. मोहिते आणि मामाची युती झाल्याने मोहिते राणाचं गुपचूप एन्काऊंटर करण्यासाठी त्याला मामाच्या ताब्यात देतो. अखेर राणाचा एन्काऊंटरचा दिवस ठरतो. तिकडे अंजली राणाला शोधतेय. तर दुसरीकडे राणाला शेवटचा निरोप देण्याची तयारी झालीये. अखेर मोहितेच्या बंदुकीतून गोळी सुटते आणि…

राणाच्या एन्काऊंटरनंतर पुढे काय घडणार, राणा निर्दोष होता हे अंजलीला कळणार का हे पुढील भागांत पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचा हा विशेष भाग १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणार आहे.