‘ये रिश्ता क्या कहलाता है” फेम अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांना सगळ्यात कूल कपल मानलं जातं. दोघांमध्ये ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीमध्ये सुद्धा स्ट्रॉंग बॉन्डिंग दिसून येत होती. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या विवाहीत जीवनात तणाव सुरू असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. यावर आता अभिनेता करण मेहराने मनमोकळे पणाने गप्पा मारून प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल दोघांच्या लग्नाला ९ वर्ष पूर्ण झाली तरीही दोघे एका अवघड टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या एक महिन्यापासून दोघांच्या नात्यात तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. या बातम्यांवर करणची पत्नी निशाने प्रतिक्रिया देत या केवळ अफवा असून यात काही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. दोघांमध्ये कोणताही तणाव सुरू नसून त्यांचं नातं पहिल्यासारखंच आहे, असं देखील निशाने सांगितलं.

माझी पूर्णपणे काळजी निशाने घेतली- करण
त्यानंतर आता अभिनेता करण मेहरानेही समोर येत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. करण मेहरा म्हणाला, “गेल्या काही दिवसांपासून मी एका पंजाबी प्रोजेक्टमध्ये व्यस्त होतो. गेले दोन आठवडे माझ्यासाठी खूप अवघड गेले. शूटिंग दरम्यान माझ्या शरीर दुखू लागलं होतं आणि खूपच थकवा आल्यासारखं वाटू लागलं होतं.” यापुढे बोलताना करण म्हणाला, त्याला करोनाचे काही लक्षणं आढळून आल्याचे दिसून आले.

करोना झाल्याची शंका वाटू लागल्यानंतर लगेचच करणने मुंबई गाठली आणि सगळ्यात आधी त्याने करोना चाचणी करून घेतली. यात त्याचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. पण काही दिवसांनी करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सध्या त्याची प्रकृती स्थिरावत आहे. हे सांगत असताना करणने निशाचं ही कौतूक केलं. ज्यावेळी त्याची तब्बेत बरी नव्हती त्या कठिण काळात निशाने त्याची काळजी घेतली असल्याचं करणने सांगितलं.