बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतला नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर तिने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले होते. या मुद्द्यावरुन आता तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनीही ट्वीट करत अप्रत्यक्षरित्या कंगनावर टीका केली आहे.
अनुपम खेर यांचे ट्वीट
“गेल्या हजारो वर्षांपासून काही लोक हे हिंदुत्वाला चांगलं-वाईट म्हणत आहेत. त्याला शिव्या देत आहेत. याला वेगवेगळी नावं देत आहेत. मात्र अशा भटकलेल्या प्राण्यांना एकतर माफ केले पाहिजे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कारण अशा प्रसंगी हिंदुत्व हे अधिक मजबूत होते, हे त्यांना माहीत नाही. कारण हिंदुत्व हा केवळ धर्म नसून ती एक जीवनपद्धती आहे,” असे ट्वीट अनुपम खेर यांनी केले आहे. यावेळी अनुपम खेर यांनी अप्रत्यक्षरित्या कंगनावर निशाणा साधला आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या ८ नोव्हेंबरला कंगना रणौतला तिच्या चित्रपटातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर कंगनाने ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.
“देशाला १९४८ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वांतत्र्य नसून ती भीक होती. आपल्याला खरे स्वातंत्र्य हे २०१४ मध्ये मिळाले. देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. मी आता राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते. सैन्यदलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीच्या प्रचाराबद्दल काम करते. पण त्यावेळी लोक मला मी भाजपचा अजेंडा चालवत आहे, असे सांगतात. तसेच या मुद्द्यावरुन मला भाजपसोबत जोडलं जाते. पण हे सर्व मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात? हे तर देशाचे मुद्दे आहेत,” असे कंगना म्हणाली.
“मी माझ्या सोशल मीडियावर एक कलाकार म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून सक्रीय असते. मी तिथे कधीही माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करत नाही. मी तिथे नेहमीच देशाचे मुद्दे मांडत असते,” असेही कंगनाने सांगितले. दरम्यान कंगनाच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या या वक्तव्यावरुन तिला ट्रोलही केले जात आहे.