राजा विक्रम याच्या जादुई रहस्यमय गोष्टी आणि थक्क करून सोडणारा वेताळ यांचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. ही अतुलनीय कथा पुन्हा एकदा अद्भुतपणे ‘अँड टीव्ही’वर साकार होणार आहे. विक्रम-वेताळच्या गोष्टीला आजच्या काळाशी जोडण्याचा प्रयत्न ‘विक्रम बेताल की रहस्य गाथा!’ या मालिकेत करण्यात आला आहे.
सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील चढाओढीचा परिपाक मांडणाऱ्या या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल की दुष्ट सैतान भद्रकाल याने आव्हान दिल्यामुळे चतुर भूत वेताळ याला शोधून हजर करण्याचा पेचप्रसंग बुद्धिमान राजा विक्रमादित्यासमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे चतुर वेताळाच्या हे लक्षात आले आहे की सैतान भद्रकाल याचा नाश करायचा असेल, तर केवळ धाडसी राजा विक्रमादित्यच ते करू शकतो. शक्ती आणि युक्ती, बुद्धी व बळ यांच्यातील हा अटीतटीचा सामना प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम करणार असून अभिनेता अहम शर्मा हा न्यायी राजा विक्रमादित्याच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हरहुन्नरी रंगभूमी आणि चित्रपट कलाकार मकरंद देशपांडे चलाख चतुर वेताळाच्या भूमिकेत आहेत. तर दिग्गज अभिनेता सूरज थापर शक्तिशाली भद्रकालची भूमिका निभावणार आहे. या मालिकेत इशिता गांगुली, अमित बहल, सोनिया सिंग आदी कलाकारांचा समावेश आहे.
तब्बल २० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा दूरचित्रवाणीकडे वळलेले नामांकित रंगभूमी कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपट अभिनेते मकरंद देशपांडे वेताळाच्या पात्राविषयी म्हणाले की ‘विक्रम बेताल की रहस्य गाथा’ मालिकेत वेताळाचे पात्र रंगविण्यासाठी मला सांगण्यात आल्यापासून मी उत्सुक होतो. वेताळ हा भूत असला तरी तो चतुर, चलाख आणि कनवाळू आहे. ज्याला आपल्या कुवतीनुसार माणसांची मदत करण्याची इच्छा आहे. कोडय़ांमधून अतिशय चलाखीने आणि हुशारीने महान राजा विक्रमादित्यला आव्हाने देण्याच्या त्याच्या पद्धतीमधून या पिशाच्चाची कुशाग्र आणि मनमोकळी बाजू सामोरी येते. म्हणूनच ही भूमिका आपल्याला आवडल्याचे त्यांनी सागितले.