Neena Gupta on romance : ‘पंचायत’ची मंजू देवी म्हणजेच नीना गुप्ता सध्या त्यांच्या ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नीना गुप्ता त्यांचे विचार उघडपणे व्यक्त करण्यावर विश्वास ठेवतात; मग ते त्यांचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा लग्नाशिवाय मुलीला जन्म देणे असो, त्या नेहमीच उघडपणे बोलल्या आहेत. नीना यांनी वयाच्या ४९ व्या वर्षी दिल्लीस्थित विवेक मेहरा यांच्याशी लग्न केले.
अलीकडेच नीना गुप्ता यांनी अनुपम खेर यांच्याबरोबर ‘बॉलीवूड बबल’ला एक मुलाखत दिली. जिथे त्यांनी सांगितले की, प्रत्येक वयात एखाद्या व्यक्तीला प्रेम आणि इंटिमसीची इच्छा असते. नीना म्हणाल्या की, महिला, विशेषतः वयानुसार आई आणि गृहिणी म्हणून नवीन भूमिका स्वीकारताना त्यांची ओळख गमावतात. परंतु, या सर्वांचा दुःखद भाग म्हणजे त्या त्यांच्या इच्छा आणि ओळख मागे सोडतात.
नीना गुप्ता म्हणाल्या, “७० किंवा ८० वर्षांच्या पुरुष किंवा स्त्रीला रोमान्सची इच्छा नसते, असं समजू नका. विशेषकरून भारतात महिला विचार करतात की, पुरे झालं. परंतु, आता मी पाहते की, मध्यमवर्गीय महिलासुद्धा जिमला जातात. त्यांनासुद्धा फिट राहायचं आहे. इच्छा असली पाहिजे. स्वप्न कोण पाहत नाही? जर ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल बोलायचं झाल्यास, एखादा दिग्दर्शक जुन्या कलाकारांमधील प्रेमसंबंध नैसर्गिक पद्धतीनं दाखवत असेल, तर त्यात काहीच हरकत नाही. वयानुसार प्रेम संपतं का?”
नीना म्हणाल्या की, मी माझं आयुष्य खूप मोकळेपणानं जगले आहे. पण एकेकाळी मला असंही वाटलं की, मला अडवणारं कोणी नाही. तुम्ही किती वाजता निघत आहात? कुठे जात आहात? कधी परत येणार आहात? हे विचारणारं कोणी नाही… अभिनेत्री म्हणाली की, लोक म्हातारपणानं मरत नाहीत; तर एकटेपणानं मरतात.
नीना गुप्ता सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या पत्रकार परिषदेच्या मुलाखतींमुळे चर्चेत आहेत. एका कार्यक्रमात स्वतःबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “ते तुम्हाला बोलवतात… पण कोणीही तुम्हाला प्रश्न विचारत नाही. तुम्हाला मोठ्या चित्रपटांमध्ये बोलावलं जातं आणि मग असंदेखील होतं की, जेव्हा तुम्ही मुलाखत संपवता तेव्हा फोटोग्राफर तुमच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांकडे धावतात, तेही तुम्हाला धक्का देऊन. बऱ्याच वेळा मी कुठेही जात नाही. कारण- मला माहीत आहे की, ते मला धक्का देऊन दुसऱ्याचा फोटो काढायला जातील.”