जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक तणावपूर्ण बनले आहेत. या सगळ्यामध्ये, अदनान सामीने अझरबैजानमधील काही पाकिस्तानी मुलांसोबत झालेला संवाद शेअर केला.
अदनान सामीने सांगितले की, त्याने योग्य वेळी पाकिस्तान सोडला आहे. एवढेच नाही, तर त्याने आपली पाकिस्तानी ओळख सोडण्याची इच्छा व्यक्त केली. अदनानकडे एकेकाळी पाकिस्तानी पासपोर्ट होता; पण २०१६ मध्ये त्याला भारतीय नागरिकत्व मिळाले.
अदनानने आता अझरबैजानमधील काही पाकिस्तानी मुलांशी झालेल्या संभाषणाबद्दल सांगितले आहे. त्याने एक्सवरील त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “बाकू, अझरबैजानच्या सुंदर रस्त्यांवर फिरत असताना, मला काही गोंडस पाकिस्तानी मुलं भेटली… ते म्हणाले, “सर, तुम्ही खूप भाग्यवान आहात… तुम्ही योग्य वेळी पाकिस्तान सोडलात… आम्हाला आमचं नागरिकत्वदेखील बदलायचं आहे… आम्हाला आमच्या सैन्याचा तिरस्कार आहे… त्यांनी आमचा देश उद्ध्वस्त केला आहे”. मी उत्तर दिले, “मला ते खूप आधी माहीत होते”.
अदनान सामीच्या या ट्विटमुळे पाकिस्तानी युजर्स संतापले. त्यांनी अदनानला देशद्रोही म्हटले. सर्व जण त्याला भित्रा म्हणत आहेत. काही लोकांनी त्याला भारतात व्यवस्थित काम करण्यास सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी कलाकार आणि सेलिब्रिटींवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत. भारतात पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे.
Met some very sweet Pakistani boys while walking on the beautiful streets of Baku, Azerbaijan…
— Adnan Sami (@AdnanSamiLive) May 4, 2025
They said “Sir, You are very lucky.. You left Pakistan in good time.. We also want to change our citizenship…WE HATE OUR ARMY…They have destroyed our country!!”
I replied “ I knew…
अदनान सामीने गायली अनेक हिट गाणी
अदनान सामी हा एक अतिशय प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आहे. ‘लिफ्ट करा दे’ आणि ‘कभी तो नजर मिलाओ’ यांसारख्या हिट अल्बमसाठी ओळखला जाणारा अदनान सामी २००१ मध्ये भारतात स्थलांतरित झाला आणि २०१६ मध्ये तो भारतीय नागरिक झाला. संगीतातील योगदानाबद्दल त्याला २०२० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अदनान सामीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता; पण त्याच्याकडे पाकिस्तानी नागरिकत्व होते. खरं तर अदनानचे वडील अर्शद सामी खान हे पाकिस्तानी हवाई दलात पायलट होते. त्यानंतर ते सीनियर ब्यूरोक्रेट्स बनले आणि नंतर त्यांनी १४ देशांमध्ये पाकिस्तानचे राजदूत म्हणून काम केले. २००९ मध्ये त्यांचे निधन झाले.