‘द कपिल शर्मा शो’ हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम. दर आठवड्याला वेगवेगळे कलाकार या चित्रपटात हजेरी लावत असतात. नुकताच या शोच्या नवीन भागाचा ट्रेलर प्रदर्शित झापा आहे. यात ‘पोन्नियिन सेल्वन १’ चित्रपटातील सर्व कलाकार सहभागी झाले. मात्र ऐश्वर्या राय – बच्चन या भागात कुठेही दिसली नाही. त्यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : आमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन

हा नवा प्रोमो पाहिल्यावर ऐश्वर्या या शोमध्ये का आलेली नाही?, या चित्रपटातील तिची भूमिका नकारात्मक आहे का? असे अनेक प्रश्न पडले प्रेक्षकांना आहेत. गेल्या काही वर्षांत चित्रपट कलाकार कपिलच्या शोमध्ये त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी जातात. ऐश्वर्याही यापूर्वी तिच्या ‘जज्बा’ आणि ‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावली आहे. मग असे काय झाले की, यावेळी ती ‘पोन्नियिन सेल्वन 1’च्या टीमसोबत या कार्यक्रमात सहभागी झाली नाही, असा प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत.

तथापि, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ऐश्वर्याच्या अनुपस्थितीचे कोणतेही कारण सांगितले नाही. अशा परिस्थितीत या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत. ज्याची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे कपिल शर्माच्या शोचा निर्माता सलमान खान. ऐश्वर्या शोमध्ये न येण्यामागे सलमान खाम हेच खरे कारण आहे असे बोलले जात आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या वेळी सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र नंतर त्यांच्यात काही कारणाने मतभेद झाले आणि त्यांनी आपले मार्ग वेगळे केले.

त्यानंतर ऐश्वर्याने एकदाही सलमान खानबरोबर काम केलेलं नाही. ‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता सलमान खान असल्याने ती या कार्यक्रमात उपस्थित नव्हती असे बोलले जात आहे. या प्रकरणात अनेक नेटकरी ऐश्वर्याच्या या वर्तणुकीचे समर्थन करत आहेत, तर काही तिला प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळे ठेवण्याचा सल्ला देत आहे.

आणखी वाचा : “आताची वेळ चांगली, कारण…”, ऐश्वर्या रायने बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट वादावर दिली प्रतिक्रिया

ऐश्वर्या असे वागण्याची ही पहिलीच वेळ नाही. अॅक्शन रिप्लेच्या वेळीही ऐश्वर्या राय बच्चनने चित्रपटाचा नायक अक्षय कुमारसोबत ‘केबीसी’मध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. कारण त्या शोमध्ये सेलिब्रिटींनी जिंकलेले पैसे सलमान खानच्या एनजीओला दान केले जाणार होते. त्यामुळे या गोष्टीचा आणि ऐश्वर्याच्या आताच्या कृतीचा संदर्भ नेटकरी लावत आहेत. पण खरे काय हे ऐश्वर्याच जाणे.

३० सप्टेंबरला ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, मळ्यालम आणि तेलगू भाषेत रिलिज होणार आहे. या मल्टीस्टारर सिनेमामध्ये विक्रम बाबू, ऐश्वर्या राय, शोभिता धूलिपाला, प्रकाश राज, रवि, तृषा आणि शरद कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.