छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असणाऱ्या रिएलिटी शोपैकी ‘कौन बनेगा करोडपती’ हा एक आहे. सध्या या शोचा १४वा सीझन सुरू आहे. ‘कौन बनेगा करोडपती १४’व्या सीझनची पहिली करोडपती एक मराठमोळी महिला बनली आहे. कोल्हापूरच्या कविता चावला यांनी एक कोटी ही धनराशी जिंकली आहे. परंतु, ७.५ कोटीसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही.

कविता चावला यांनी ७.५ कोटीसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर खेळ सोडला. त्यांना शेवटचा प्रश्न एका क्रिकेटपटूबद्दल विचारण्यात आला होता. “मला ७.५ कोटींसाठी विचारण्यात आलेला प्रश्न क्रिकेटर गुंडप्पाविश्वनाथ यांच्याबद्दल होता. गुंडप्पाविश्वनाथ यांनी कोणत्या संघाविरुद्ध द्विशतक झळकावलं असा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर मला माहीत नव्हतं. मला क्रिकेटमध्ये एवढी रुची नाही आहे. म्हणून मी धोका न पत्करता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु मी खूश आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी आजतकशी बोलताना दिली.

हेही वाचा >> “लोक मला अमिताभ बच्चन म्हणून… ” विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांनी सांगितला होता ‘तो’ किस्सा

कविता चावला यांना ७.५ कोटींसाठी पुढील प्रश्न विचारण्यात आला होता.

पहिल्या फळीत पदार्पण करत क्रिकेटर गुंडप्पा विश्वनाथने कोणत्या संघाविरुद्ध द्विशतक झळकावले होते?

ए) सर्विसेस

बी) आंध्र

सी) महाराष्ट्र

डी) सौराष्ट्र

हेही पाहा >> Photos : ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरे दाक्षिणात्य अभिनेत्रीसह करणार काम; ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या प्रश्नाचं योग्य उत्तर ‘आंध्र’ असं होतं. कविता यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर एक कोटींची धनराशी जिंकली. परंतु, ७.५ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसल्याने त्यांनी खेळ सोडला. ४५ वर्षीय कविता या दुसऱ्यांदा शोमध्ये सहभागी झाल्या. पहिल्यांदा हॉटसीटवर न पोहोचू शकलेल्या कविता दुसऱ्यांदा शोमध्ये पोहोचल्यावर सीझनच्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत.