आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला ‘चिडिया’ हा चित्रपट येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा विशेष शो सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार यांच्यासाठी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला होता. चित्रपट पाहिल्यानंतर लहानपणीची स्वप्ने आणि संघर्ष याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात असून अतिशय उत्तम चित्रपट आहे, अशा शब्दांत आशीष शेलार यांनी कौतुक केले.
‘चिडिया’ ही मुंबईच्या चाळीत रचलेली एक सुंदर कथा आहे. स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झगडणाऱ्या मुलांची कथा या चित्रपटात पाहायला मिळते. हृदयस्पर्शी कथा असलेला हा चित्रपट जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता तो संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे चित्रपटाचे निर्माते अकबर हुसैनी यांनी आवर्जून नमूद केले. की मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत ‘चिडिया’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर मेहरान अमरोही यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.
या चित्रपटात विनय पाठक, अमृता सुभाष, श्रेयस तळपदे, इनामूल हक, ब्रिजेंद्र काला यांच्यासह उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रीतेश खुशवाह यांचे आहे.