‘धूम ३’ च्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येते आहे तसतसे आमिर खानच्या मनावरचा ताण वाढत चालला आहे. मात्र, अन्य दोन ‘खानां’नी त्याचे कौतुक करत त्याला आश्चर्याचा धक्का दिला आहे. आमिर सर्वात चांगला अभिनेता आहे, असे जाहीररित्या सांगून शाहरूखने या ‘आनंद सोहळ्या’ची सुरुवात केली. शाहरूच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करत आमिरनेही ‘धूम’च्या पुढच्या मालिका शाहरूख आणि सलमानकडे गेल्या तर तेही मोठा पडदा गाजवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
‘धूम’चे प्रेक्षकांना असणारे आकर्षण लक्षात घेता त्याच्या पुढच्या दोन भागांची निर्मिती करण्याचा यशराजचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राचा विचार असल्याचे बोलले जात आहे. या दोन भागात शाहरूख खान आणि सलमान खान हे नायक असतील, अशीही चर्चा असल्याबद्दल ‘धूम ३’च्या प्रसिध्दीसाठी आलेल्या आमिरला विचारणा करण्यात आली. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता आदिला शाहरूख ‘धूम’ साठी योग्य वाटत असेल तर तो चांगली कामगिरी बजावेल, असे आमिरने सांगितले.
खरेतर, ‘धूम ३’ मधली खलनायकी छटा असणाऱ्या नायकाची भूमिका साकारण्याची इच्छा शाहरूखने जाहीरपणे व्यक्त केली होती. याआधीही, शाहरूखने ‘डर’, ‘बाजीगर’ सारख्या चित्रपटांमधून असा नायक साकारलेला आहे. मात्र, तरीही आदित्य चोप्राने शाहरूखऐवजी आमिरची निवड केली. शाहरूखने मध्यंतरी एका मुलाखतीत आमिरची ‘धूम ३’ मधील भूमिकेसाठी खूप प्रशंसा केली होती. आमिर एक चांगला अभिनेता असून त्याने ‘धूम ३’ साठी घेतलेली मेहनत इतरांसाठी आदर्श ठरेल, असे किंग खानने म्हटले होते. शाहरूखच्या तोंडून आपल्यासाठी कौतुकाचे शब्द ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याची कबुली आमिरने दिली.
तर दुसरीकडे मित्र सलमान खानच्या कृतीनेही आमिर भारावून गेला आहे. ‘माझी टोपी तुझ्याकडे पाठवतो आहे. तू काही समारंभांना जाणार असशील तर ती घालून जा. म्हणजे चित्रपटाची थोडीशी प्रसिध्दीही होईल, अशी विनंती मी सलमानला केली होती. पण, तो थेट ‘बिग बॉस’च्या सेटवर ही टोपी घालून जाईल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. तो शो म्हणजे त्याचा चित्रपट नाही पण, तरीही त्याने मैत्रीखातर तसे केले. सलमानची हीच गोष्ट मला खूप आवडते’, असे आमिरने सांगितले. एकंदरीतच, ज्या ‘खाना’वळीतून भांडणाचा कोलाहल ऐकू यायचा तिथे आता ‘तू किती छान, तो किती छान’चे मधुर संगीत कानावर येत आहे.