‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून आमिर खानने जबरदस्त कमबॅक करायचा प्रयत्न केला, पण या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे सपशेल पाठ फिरवली अन् तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिरच्या कारकीर्दीतील हा आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. यानंतर आमिर खानने अभिनयातून काही काळ ब्रेक घ्यायचं ठरवलं, तेव्हापासूनच आमिर लाईमलाइटपासून दूर झाला.

नुकतंच आमिरने पंजाबी चित्रपट ‘कॅरी ऑन जट्टा ३’च्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला हजेरी लावली. या चित्रपटाचा ट्रेलर आमिरच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. याच इव्हेंटदरम्यान आमिर पुन्हा चित्रपटात कधी झळकणार असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.

आणखी वाचा : “राम चरण माझे कॉल उचलत नाही…” दिग्दर्शक अपूर्व लाखियाचा मोठा खुलासा, नेमकं कारण काय?

या प्रश्नाचं उत्तर देताना आमिर म्हणाला, “मी अद्याप कोणताही चित्रपट स्वीकारलेला नाही. मला सध्या फक्त माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे आणि मी तेच करत आहे. जेव्हा चित्रपट करायची माझी मानसिक तयारी असेल तेव्हा मी नक्कीच काम करायला सुरुवात करेन.” या सोहळ्यादरम्यान चित्रपटातील प्रमुख कलाकार गीप्पी ग्रेवाल, सोनम बाजवा हेदेखील उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच या इव्हेंटमध्ये आमिरला पंजाबी चित्रपटात काम करायची इच्छा आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आमिरने शत्रुघ्न सिन्हा, सुनील दत्त, राज कपूर यांनीही पंजाबी चित्रपट काम केल्याचा दाखला दिला. याबद्दल आमिर म्हणाला, “माझ्यासाठी चित्रपटाची कथा महत्त्वाची असते. शिवाय ती कथा दुसऱ्या भाषेत असेल तर मला आणखी आनंद होतो कारण मला नवीन भाषा शिकायला आवडतात. दिलीप कुमार, राज कपूर यांच्यासारखे कलाकारांची तर पहिली भाषा पंजाबीच होती, पण माझी पहिली भाषा पंजाबी नाही, पण मला त्या भाषेतील चित्रपटात काम करायला नक्की आवडेल.”