Aamir Khan Recalls Eight Years Of Poverty: बॉलीवूड अभिनेता आमिर खान लवकरच ‘सितारे जमीन पर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.
चित्रपटाबरोबरच अभिनेता त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्यातील अनेक बाबींवर दिलखुलास संवाद साधला आहे.
राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने नुकतीच हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने रीना दत्ताबरोबर लग्न करताना खूप घाई केली होती, असे सांगून आता जर तो कोणाला भेटला तर चार महिन्यात तो लग्नाचा निर्णय घेऊ शकणार नाही, असे वक्तव्य त्याने केले. तसेच सध्या तो थेरपी घेत असल्याने त्याला स्वत:चे परीक्षण करण्यास मिळते. स्वत:ला अधिक समजून घेण्यास मदत होते, असे वक्तव्य त्याने केले. तसेच त्याचा अभिनेत्री जुही चावलाबरोबर सात महिने अबोला होता, असे वक्तव्य त्याने केले.
लोकांना वाटतं निर्मात्याच्या घरी खूप…
याबरोबरच, आमिर खानने त्याच्या कठीण काळाची आठवणदेखील सांगितली. एक काळ असा होता की आमिर खानच्या वडिलांकडे पैसे नव्हते. घरची पार्श्वभूमी ही चित्रपटसृष्टीतील असली तरीही त्याला नेपोटिझमचा कोणताही फायदा मिळाला नाही, असेही वक्तव्य त्याने केले.
आमिर खान म्हणाला, “लोकांना वाटतं निर्मात्याच्या घरी खूप पैसे असतात. पण, हे सत्य नाही. अनेक निर्मात्यांना खूप संघर्ष करावा लागतो. माझ्या घरी आठ वर्षे उत्पन्न येत नव्हते. गरिबी होती, कारण माझ्या वडिलांनी कर्ज घेतले होते, त्याचे व्याज खूप होते. त्यावेळी मी व्यावसायिक टेनिस खेळत होतो. त्यातून मला जे पैसे मिळायचे ते पैसे मी माझ्या आईजवळ द्यायचो. तिला सांगायचो की, माझ्यासाठी काहीही साहित्य घ्यायचे असले तरी त्या पैशातून घे. हे सगळं सांगताना मी खूप कमी वयात जास्त समजूतदार झालो, याची मला जाणीव होत आहे.”
आमिर खानचे वडील ताहिर हुसैन यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये ‘कारवाँ’, ‘अनामिका’, ‘हम हैं राही प्यार के’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘तुम मेरे हो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले. हा चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला. २०१० मध्ये ताहिर हुसैन यांचे हृदयविकाराने निधन झाले.
आमिर खान असेही म्हणाला की, माझे वडील शब्दांचे पक्के होते. ते त्यांचा शब्द पाळत असत. ते कलाकारांना सांगत की सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी तुमचे मानधन देईन. जेव्हा ‘जख्मी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी सुनील दत्त यांना वाटले की त्यांना त्यांचे मानधन मिळणार नाही. पण, चित्रपटाने उत्तम कमाई केली. त्यानंतर ताहिर हुसैन यांनी सुनील दत्त यांना मानधन दिले. ही गोष्ट मला दत्त साहेबांनी सांगितली होती. तसेच संपूर्ण चित्रपट जेव्हा तुम्ही एका ओळीत सांगू शकता तेव्हा चित्रपट हिट होतो, असे वडिलांनी सांगितलेली गोष्ट लक्षात असल्याचे आमिर खानने म्हटले.
दरम्यान, ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २० जून २०२२ ला प्रदर्शित होणार आहे.