कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सगळ्याचं लक्ष वेधून घेत असते. चित्रविचित्र कपडे घातल्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन लोकप्रिय लेखक चेतन भगत यांनी नुकतीच एका मुलाखतीदरम्यान तिच्यावर टीका केली होती. तेव्हापासून उर्फी जावेद आणि लोकप्रिय लेखक चेतन भगत यांच्यातील वाद चांगलाच पेटून उठला आहे. आता या वादात लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री ऋतुजा सावंत हिने उडी घेत जावेद जावेदचे समर्थन केलं आहे.

चेतन भगत यांनी ‘साहित्य आजतक २०२२’ या मुलाखतीत तरुण पिढीला पुस्तक वाचण्याचा सल्ला देताना उर्फी जावेदबाबत गंभीर वक्तव्यही केलं होतं. “देशातील तरुण पिढी सोशल मीडियावर उर्फी जावेदचे फोटो लाइक करत आहे. हा कोणत्या शिक्षणाचा भाग आहे का? तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये मला उर्फी जावेदचे सगळे कपडे माहीत आहेत, हे सांगणार आहात का? देशातील तरुण वर्ग रात्री बिछान्यात उर्फी जावेदचे फोटो बघत आहे. अशा तरुण वर्गाचं काय होणार? असं म्हणत उर्फीवर टीका केली होती.

आणखी वाचा :अभिनेत्री नव्हे तर यामी गौतमला व्हायचं होतं IAS ऑफिसर, पण…

त्यानंतर उर्फीनेही त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं, “तुमच्यापेक्षा अर्ध वय असलेल्या मुलींना तुम्ही इन्स्टाग्रामवर मेसेज केले होते. बलात्कारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणं बंद करा. महिलांना त्यांच्या कपड्यांवरुन बोलणं, हे ८०च्या दशाकातील पुरुषांचे विचार होते. तुमच्यासारखे पुरुष नेहमी महिलांनाच दोषी ठरवतात. तुम्ही दरिद्री आहात यात महिलांचा किंवा त्यांनी घातलेल्या कपड्यांचा दोष नाही. उगाच मला मध्ये आणून माझ्या कपड्यांवर कमेंट करण्याची काहीच गरज नव्हती.”

यानंतर आता ‘पिशाचिनी’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा सावंत हिने उर्फीची बाजू घेत चेतन भगत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ई टाइम्स’च्या वृत्तानुसार ती म्हणाली, “आपण लवकरच २०२३ मध्ये पदार्पण करणार आहोत. पण आपल्या समाजातील काही ‘सुशिक्षित’ लोक स्त्री तिच्या आवडीचे कपडे घालते म्हणून तिची चेष्टा करण्यात व्यस्त आहेत. तुमची मानसिकता कधी बदलणार?”

हेही वाचा : अभिनेत्री उर्फी जावेदचा छोट्या पडद्यावर कमबॅक; सनी लिओनीबरोबर शेअर करणार स्क्रीन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “मुलींच्या कपड्यांचा सार्वजनिक व्यासपीठावर चर्चेचा विषय बनवताना तुम्हाला लाज वाटत नाही का? भारतातील तरुणांसाठी तुम्ही स्त्रीच्या फॅशनच्या आवडीनिवडीला कसे दोष देऊ शकता? लेखक चेतन भगत यांनी केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते. काळ पुढे सरकत आहे आणि लोकांची विचारसरणी अजूनही मागे आहे. चेतन भगत यांनी त्यांचे विचार सुधारण्याची वेळ आता आली आहे. तुम्ही या देशाला मागे न घेता पुढे नेण्याचा प्रयत्न करा.” तिच्या या बोलण्याने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं आहे.