Amitabh Bachchan praises Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनने ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. जे. पी. दत्ता दिग्दर्शित हा चित्रपट ३० जून २००० ला प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अभिषेक बच्चनने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

अभिषेक बच्चनबद्दल अमिताभ बच्चन काय म्हणाले?

आज अभिषेक बच्चनच्या पदार्पणाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सगळ्यात अमिताभ बच्चन यांनी अभिषेकचे केलेले कौतुक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. एक्स या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर एका चाहत्याने अभिषेक बच्चनच्या विविध पात्रांचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यावर अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले, “ज्या पद्धतीने अभिषेकने विविध धाटणीची पात्रे साकारली आहेत, त्याचे मला कौतुक वाटते. या विविधतेला मी नमन करतो. मी त्याचा बाप आहे आणि माझ्यासाठी माझा मुलगा अभिषेक कौतुकास पात्र आहे.”

याआधीदेखील अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये अभिषेकचे कौतुक केले होते. त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले होते, “त्याने ज्या भूमिका स्वीकारल्या, त्या त्याने पूर्ण समर्पणाने साकारल्या. त्याने जे चित्रपट आणि भूमिका निवडल्या, त्यामुळे त्याला नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळाली आहे.”

“मी लहान असताना महान हिंदी कवी श्री राम धारी सिंह अनेकदा प्रयागराजमध्ये आमच्या घरी यायचे. त्यावेळी एकदा ऑटोग्राफ देताना लिहिले होते की, जे धाडस करतात आणि प्रयत्न करतात, त्यांना यश मिळते. मला त्या ओळी आठवल्या. अभिषेकने कायमच हे केले आहे. त्याला ज्या भूमिका आणि चित्रपट आव्हानात्मक वाटले, ते त्याने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याने प्रयत्न करण्याचे धाडस केले”, असे म्हणत अभिषेकने त्याच्या कारकि‍र्दीत साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांचे त्यांनी कौतुक केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेक बच्चनच्या कामाबाबत बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘कालीधर लापता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ४ जुलै २०२५ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची महत्त्वाची भूमिका असलेला ‘हाऊसफुल ५’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चाहत्यांकडून कौतुक होताना दिसत आहे. आता ‘कालीधर लापता‘मधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.