Amruta Subhash : अमृता सुभाषने २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्वास’ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. अभिनेत्री नेहमीच नवनवीन कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. गेल्या काही वर्षांत अमृताने मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘सॅक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज २’, ‘रमन राघव’ अशा बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये तिने काम केलेलं आहे.
अमृताने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ चित्रपटात रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली होती. अलीकडच्या काळातील अनेक अभिनेत्री कमी वयात आईची भूमिका स्वीकारण्यास नकार देतात पण, अमृताच्या बाबतीत तसं झालं नाही. तिने रणवीरच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका इतकी दमदार साकारली की, ‘गली बॉय’साठी अमृताला ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’चा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ सुद्धा मिळाला आहे. या सिनेमाबद्दल आणि कमी वयात आईची भूमिका का स्वीकारली? याबद्दल अमृताने ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला.
अमृता म्हणाली, “रणवीर माझ्यापेक्षा वयाने फक्त ७ ते ८ वर्षांनी लहान असेल. आता ‘गली बॉय’मध्ये मला त्याच्या आईची भूमिका साकारायची होती. त्यामुळे निश्चितच दडपण होतं. अगदी जेव्हा झोयाने मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिचीही प्रतिक्रिया अशीच होती…’अरे तू खूपच लहान आहेस, नाही वर्क होणार…’ मग मी तिला विचारलं, आधी काय आहे ते तरी मला सांग. मग तिने मला या चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगितलं आणि झोया म्हणाली होती पण, प्रमाणिकपणे मला तू त्या भूमिकेत फिट होणार नाहीस असं वाटतंय.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “अचानक माझ्यात कुठून एवढा आत्मविश्वास आला मला अजूनही माहिती नाही मी तिला म्हणाले, मला स्क्रिप्ट दे…मी चांगलं करेन. मग तिने माझ्याकडे एकदा पाहिलं आणि ती स्वत:च म्हणाली मी स्क्रिप्ट देतेय आणि तू नाही म्हणालीस तरी माझी काहीच हरकत नाहीये. उगाच प्रेशरमध्ये निर्णय घेऊ नकोस…तू स्क्रिप्ट वाच आणि तुला योग्य वाटेल तो निर्णय घे.”
“मी ‘गली बॉय’ चित्रपटाची स्क्रिप्ट वाचायला घेतली. त्यात एक वाक्य आहे, “क्या तुमने कभी सोचा था की मुझे कैसे छूना है” हे वाक्य मी वाचलं अर्थात हा सीन विजयराज सर आणि माझा होता. विचार करा… झोपडपट्टीत, धारावीत राहणारी एक महिला तिच्या पतीला हे वाक्य आपल्या मुलांसमोर बोलतेय…हा सीन वाचून माझं असं झालं की, भाई हे काय वाक्य आहे…म्हणजे काहीही झालं तरी तो सीन मीच करणार अशी भावना मनात आली. सगळी भीती वगैरे निघून गेली आणि मी चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.” असं अमृताने सांगितलं.
पुढे विजयराज यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना अमृता सुभाष म्हणाली, “झोयाला मी माझा निर्णय कळवला…ती सुद्धा सेटवर आधी रिहर्सल वगैरे घेते. विजयराज सरांना मी सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीय नाट्य विद्यालयात पाहिलं होतं. मला रिहर्सल करतानाच भीती वाटत होती. पण, सरांनी मला हा विशिष्ट सीन करताना खूप गाइड केलं…टायमिंग शिकवलं. तेव्हा विजयराज सरांनी मला खूप छान समजावून सांगितलं होतं. “क्या तुमने कभी सोचा था की मुझे कैसे छूना है” या वाक्याचं, त्या सीनचं गांभीर्य सांगितलं. तो सीन इतका भारी झाला की आम्ही कट न करता सलग तो सीन पूर्ण केला…शेवटी त्या सीनमध्ये रणवीरची एन्ट्री होते. मी त्यावेळी त्याला ( रणवीर ) मिठी मारून खूप रडले.”