बॉलिवूडची ‘दिलबर गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या तिच्या ‘ताली’ या वेब सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिने तृतीयपंथी लोकांच्या समस्येवर भाष्य केलं आहे. समाजसेविका गौरी सावंत हिच्या जीवनावर ही सीरिज बेतलेली आहे. यातील सुश्मिताच्या कामाचं चांगलंच कौतुक होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सुश्मिताला वेगवेगळ्या अन् धाडसी अशा भूमिका मिळत असल्या तरी एक काळ तिने रुपेरी पडदाही गाजवला आहे.

बॉलिवूडच्या सगळ्याच टॉपच्या अभिनेत्यांबरोबर सुश्मिताने काम केलं आहे. नुकतंच तिने तिच्या २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे. या चित्रपटात सुश्मिताची अगदी छोटीशी भूमिका होती पण या भूमिकेचा प्रेक्षकांवर पडलेला प्रभाव आणि त्यामुळे तिला जाणवलेले बदल याबद्दल सुश्मिताने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “या चित्रपटाने मोठा धडा शिकवला…” आजवर प्रदर्शित न झालेल्या ‘पांच’ चित्रपटाबद्दल के के मेनन यांनी व्यक्त केली खंत

‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधताना सुश्मिता म्हणाली, “चित्रपटाचा फायनल कट पाहून फराह खानने मला फोन केला आणि माझी तिने माफी मागितली. फराह म्हणाली जरी चित्रपटात शाहरुख, अमृता आणि जायेद यांच्या मुख्य भूमिका असल्या तरी तुझ्या भूमिकेने प्रेक्षकांवर एक वेगळीच जादू केली आहे. तुला चित्रपटात फारसा स्क्रीन टाइम नाहीये याचं मला वाईट वाटतंय.” सुश्मिताने त्यावेळी फराहला सांगितलं की त्यांच्यात एक करार झाला होता आणि त्याप्रमाणेच त्यांनी काम केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मैं हूं ना’मध्ये सुश्मिता सेनने ‘चाँदनी’ नावाच्या प्रोफेसरची भूमिका निभावली होती. प्रेक्षकांनी सुश्मिताचं केलेलं कौतुक पाहता मुंबईमध्ये लागलेली चित्रपटाची पोस्टर्स रातोरात बदलण्यात आली अन् त्याजागी शाहरुख आणि सुश्मिताच्या जोडीची पोस्टर्स झळकली. इतकंच नव्हे तर चित्रपट पाहून झाल्यावर दिग्दर्शक यश चोप्रा यांनीसुद्धा सुश्मिताला फोन करून तिच्या कामाचं कौतुक केलं.