G-20 शिखर परिषदेदरम्यान सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन दिल्लीत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी जगभरातील मोठमोठे नेते आणि नोकरशहा मंडळी दिल्लीत येणार आहेत. दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून दिल्ली सरकारने ८ ते १० सप्टेंबरपर्यंत दिल्ली बंद ठेवण्याची योजना आखली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याने याचा फटका शाहरुखच्या चित्रपटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्याप या दोन दिवसांत चित्रपटगृहदेखील बंद राहण्याबद्दल दिल्ली सरकारने भाष्य केलं नसलं तरी ही गोष्ट शाहरुखच्या चित्रपटाला मारक ठरू शकते.

दिल्ली सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, विभाग, महामंडळे, शाळा आणि महाविद्यालये हे तीन दिवस बंद राहतील. शनिवारी आणि रविवारी सुरू असलेली खासगी कार्यालयेही या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, नवी दिल्ली पोलीस जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था, बाजारपेठा, दुकाने आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठान देखील ८ ते १० सप्टेंबरदरम्यान बंद राहणार आहेत. या काळात कॅनॉट प्लेस, खान मार्केट आणि चाणक्यपुरी सारखे गजबजलेले परिसरदेखील बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत.

आणखी वाचा : ‘चांद्रयान ३’वरील चित्रपटाची घोषणा; ‘मिशन मंगल’च्या दिग्दर्शकाचं मोठं विधान; म्हणाले, “ही संधी…”

यामुळेच दिल्लीतील चित्रपटगृहसुद्धा बंदच असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर असं झालं तर यादरम्यान शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला चांगलाच फटका बसणार हे निश्चित आहे. शाहरुखच्या चित्रपटांची चर्चा मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरात प्रचंड असते अन् अशातच दिल्लीमध्ये या दिवसांत चित्रपटगृह बंद ठेवली तर यामुळे ‘जवान’च्या कमाईमध्ये चांगलाच फरक पडू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जवान’ची सध्या जबरदस्त चर्चा आहे. ‘पठाण’प्रमाणेच जगभरात हा चित्रपटही १०० कोटींची कमाई करेल असं तज्ञांचं म्हणणं आहे. बाहेरील देशात या चित्रपटाचं अडवांस बुकिंग सुरू झालं आहे आणि प्रेक्षकांचा याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. ‘जवान’मध्ये शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदूकोण, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवरसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.