Javed Akhtar on Allowing Pakistani Artists: काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ ला हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला. त्यानंतर देशभरातून त्यावर प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. कलाकारांनीदेखील मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमातून त्यांचा संताप व्यक्त केला.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यालादेखील विरोध केला गेला. आता जावेद अख्तर यांनीदेखील पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य केले आहे. आता ज्येष्ठ पटकथा लेखक जावेद अख्तर यांनीदेखील पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देऊ नये, असे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तान कलाकारांनी भारतात काम करण्याबाबत जावेद अख्तर काय म्हणाले?

पीटीआयशी संवाद साधताना जावेद अख्तर म्हणाले की, भारतातील दिग्गज कलाकारांना पाकिस्तानने कधीही आमंत्रित केले नाही. पहिला प्रश्न असा आहे की आपण पाकिस्तानी कलाकारांना इथे परवानगी द्यायची का? याची दोन उत्तरे आहेत आणि दोन्हीही तितकीच तार्किक आहेत. नुसरत फतेह अली खान, गुलाम अली आणि नूरजहाँ भारतात आले होते, आम्ही त्यांचे खूप चांगले स्वागत केले. लोकप्रिय कवी फैज अहमद फैज पाकिस्तानमध्ये राहत होते. जेव्हा ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकि‍र्दीत भारतात आले, तेव्हा त्यांना सरकारने मोठ्या आदराने वागवले होते. राज्यप्रमुखांसारखी त्यांना वागणूक दिली होती, असा प्रतिसाद पाकिस्तानकडून कधीच मिळाला नाही.

“मला पाकिस्तानच्या लोकांबद्दल कोणतीही तक्रार नाही. पाकिस्तानच्या मोठ्या कवींनी लता मंगेशकर यांच्यासाठी कविता लिहिल्या आहेत. पाकिस्तानमध्ये ६० आणि ७० च्या दशकात त्या भारतातील सर्वात लोकप्रिय कलाकार होत्या. पण, पाकिस्तानमध्ये लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम का झाला नाही? पाकिस्तानच्या नागरिकांचे लता मंगेशकर यांच्यावर प्रेम होते, त्यामुळे मी त्यांच्याकडे तक्रार करणार नाही. पण, काही अडथळे होते. पाकिस्तानच्या व्यवस्थेमुळे हे अडथळे निर्माण झाले होते, त्यामुळे भारताने हे एकतर्फी प्रयत्न करणे योग्य नाही.

दुसरा प्रश्न असा की, जर आपण पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घातली तर याचा कोणाला आनंद होणार आहे? तर याचा आनंद लष्कर आणि जे कट्टरपंथी आहेत, त्यांना आनंद होणार आहे. त्यांना दोन देशात असणारे अंतर हवे आहे. भारत व पाकिस्तानमध्ये इतके अंतर यावे की पाकिस्तानमधील नागरिकांना भारतातील नागरिकांचे स्वातंत्र्य व त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा दिसू नयेत, असेच त्यांना वाटते. सध्या पाकिस्तानच्या कलाकारांना भारतात काम करण्यासाठी मी नाही म्हणेन, असे जावेद अख्तर यांनी म्हटले.

जावेद अख्तर यांनी नुकताच एएनआयशी संवाद साधला. ते म्हणाले की, दर काही महिन्यांनी, वर्षांनी असे हल्ले होतात त्यामुळे चिंता वाटते. पाकिस्तानने कितीही म्हटले की आमचा या दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नाही, तर हे दहशतवादी कुठे जातात? इथून पळून ते जर्मनीला जाऊ शकत नाहीत, कारण भारताला जर्मनीची सीमारेषा नाही. हे सगळं करून त्यांना काय मिळते हे समजत नाही. पर्यटकांवर गोळीबार करून त्यांना काय मिळाले? असे हल्ले झाल्यानंतर काही दिवस चर्चा होतात, त्यानंतर सगळे विसरून जातात; यावेळी सरकारने काही ठोस पावले उचलली पाहिजेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, फवाद खानच्या अबीर-गुलाल या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याला भारतात बंदी घातली आहे.