Javed Akhtar on Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशनचे २०१६ मध्ये ब्रेकअप झाले, ज्यामुळे दोघांमध्ये बराच वाद झाला होता. रोशन कुटुंबाच्या जवळ असलेल्या जावेद अख्तर यांनी हृतिक रोशनची माफी मागण्यास सांगितले होते, असा दावा कंगना रणौत यांनी केला होता. त्यानंतर २०२० मध्ये त्यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्यातील वाद मिटला असल्याचा खुलासा केला होता.
त्यांच्याविरुद्ध राग बाळगण्यात…
आता जावेद अख्तर यांनी यावर वक्तव्य केले आहे. प्रसिद्ध लेखक व गीत रचनाकार जावेद अख्तर यांनी ‘लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत कंगना रणौत यांच्याबरोबरच्या वादावर जावेद अख्तर म्हणाले, “मी त्यांना न्यायालयात भेटलो. त्यांनी न्यायाधीशांसमोर माफीनामा लिहिला आणि त्यावर सही केली.”
पुढे जावेद अख्तर म्हणाले, “मी कधीच त्यांच्याकडून पैशांची मागणी केली नव्हती. त्यांनी माफी मागावी असे मला वाटत होते आणि त्यांनी ते केले. न्यायाधीशांनीदेखील त्यावर सही केली. त्यानंतर मी व कंगना रणौत, आम्ही एकमेकांशी बोललो. कंगना रणैत यांनी मला विचारले की तुम्ही माझ्या पुढच्या चित्रपटासाठी गाणी लिहिणार का? त्यावर मी म्हणालो की का लिहिणार नाही?”, असे म्हणत कंगना रणौत यांच्या पुढच्या चित्रपटांसाठी गाणी लिहिण्यासाठी होकार दिल्याचे जावेद अख्तर यांनी सांगितले.
तसेच जावेद अख्तर पुढे म्हणाले, “कंगना रणौतच्या वकिलांनी असेही सांगितले की त्या माफीनाम्यामध्ये त्या जावेद अख्तरांचा आदर करतात. त्यांना ते वडिलांसारखे आहेत, या गोष्टी जोडण्यास सांगितल्या. पण, मी त्यांना सांगितले की असे काही लिहू नका. मला इतक्या सुंदर मुलीच्या वडिलांच्या स्थानी यायचे नाही.”
माफीनाम्यामध्ये माफीबरोबरच कंगनाने आणखी काय लिहिले आहे, याबद्दल सांगताना जावेद अख्तर म्हणाले,”पुन्हा माझ्याविरुद्ध अशी वक्तव्ये करणार नाही, असेही कंगना रणौत यांनी लिहिले आहे. मला आणखी काय हवं? त्यांच्याविरुद्ध राग बाळगण्यात काही अर्थ नाही. त्यांनी त्यांची चूक सुधारली आणि तेवढंच महत्त्वाचं आहे. आता, जेव्हा आमची भेट होईल, तेव्हा आम्ही एकमेकांना आदराने आणि प्रेमाने भेटू.”
याच मुलाखतीत, जावेद अख्तर असेही म्हणाले की सर्व चुका माफ केल्या जाऊ शकत नाहीत. ते म्हणाले “काही लोक असे आहेत ज्यांना मी माफ केलेले नाही. मी त्यांची नावे उघड करणार नाही. मला अजूनही त्यांच्याबद्दल राग आहे”.
दरम्यान, जावेद अख्तर यांनी हे त्यांच्या पटकथांसाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत असतात.