Bollywood Legends Who Hail From Balochistan: सध्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान हा प्रांत मोठ्या चर्चेत आहे. बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळे होण्याची मागणी करीत आहे. त्याने पाकिस्तानी सैन्याविरुद्ध उघड बंड पुकारले आहे. बलूच लिबरेशन आर्मीकडून सातत्याने पाकिस्तानमध्ये हल्ले घडवून आणले जात आहेत.
एकेकाळी बलुचिस्तान हा भारताचा भाग होता. १९४७ ला जेव्हा भारताची फाळणी झाली. त्यावेळी बलुचिस्तानमधील अनेक नागरिक भारतात आले. तुम्हाला माहित आहे का बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार हे बलुचिस्तानमध्ये जन्मलेले आहेत. कादर खान, राजकुमार, अमजद खान आणि सुरेश ओबेरॉय या कलाकारांचा पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताशी संबंध आहे.
बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांचा आहे बलुचिस्तानशी संबंध
प्रसिद्ध अभिनेते कादर खान यांचा जन्म बलुचिस्तानमधील पिशीन येथे झाला. त्यांनी त्यांचे बालपण बहुतेक काळ त्यांच्या आईबरोबर पिशिनमध्ये घालवले. कालांतराने त्यांचे वडील व्यवसायासाठी कुटुंबासह मुंबईत आले.
राजकुमार हे भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते. कुलभूषण पंडीत असेही त्यांचे नाव आहे. ‘अपने पैर जमीन पर मत रखिएँगा, मैले हो जाएँगे’ हा त्यांचा डायलॉग मोठ्या प्रमाणात गाजला होता. ‘तिरंगा’, ‘सौदागर’, ‘मदर इंडिया’, असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९२६ रोजी बलुचिस्तानमधील लोरालाई येथे झाला होता. नंतर ते मुंबईत आले. बॉलीवूडमध्ये काम करण्यापूर्वी ते मुंबई पोलिसात उपनिरीक्षक म्हणून काम करत होते.
भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेमे प्रचंड गाजले. त्यामध्ये शोले हा एक सिनेमा आहे. कितने आदमी थे हा डायलॉग आजही लोकांच्या तोंडी असतो. या चित्रपटात गब्बर ही भूमिका अमजद खान यांनी साकारली होती. अजमद खान यांची गब्बर ही भूमिका प्रचंड गाजली. अजमद खान यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० ला बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथे झाला होता.
इतकेच नाही तर सुरेश ओबेरॉय यांचा जन्मदेखील बलुचिस्तानमधील क्वेटा येथे झाला आहे. तसेच, हिना चित्रपटातील प्रसिद्ध नायिका झेबा बख्तियार यादेखील बलुचिस्तानमधील आहेत.