Nana Patekar Village Life: नाना पाटेकर अनेक दशकांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. पण ते खूप साधेपणाने आयुष्य जगतात. शूटिंग आणि चित्रपटांशी संबंधित काम असेल, तेव्हाच ते मुंबईत येतात. नाहीतर ते गावाकडे असतात. गावी त्यांच्याकडे गाई आहेत, त्यांनी तिथेच जिम बनवलं आहे. नाना यांनी ‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये त्यांच्या गावातील दिनचर्येबद्दल सांगितलं होतं.
नाना पाटेकर स्वतःला इंडस्ट्रीतला नाही तर गावाकडचा माणूस म्हणतात. त्यांचं मन गावातच रमतं. ‘आपण गावातच राहायला हवं, असं तुम्हाला कधी वाटलं?’ असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला होता. “मी इंडस्ट्रीतला नाहीच, मी गावाकडचा माणूस आहे. मी इकडे काम करतो आणि परत गावी जातो. मी गाव-खेड्यात राहतो आणि तिथेच राहणार, तिकडेच मला बरं वाटतं,” असं नाना म्हणाले होते.
नाना पाटेकर नंतर प्रेक्षकांना उद्देशून म्हणालेले, “मी अमिताभ बच्चन यांना विचारलं की, ‘तुम्ही इतकं काम का करता? गावात येऊन आठवडाभर राहा. तिकडे फारच निवांत वाटतं. त्यावर त्यांनी मला सांगितलं की, ते दिवासातले १२ तास काम करतात. या वयात ते इतकं काम करू शकतात, य गोष्टीसाठी मी त्यांच्यापुढे खरंच नतमस्तक आहे.”
नाना पाटेकरांची गावातील दिनचर्या
नाना पाटेकरांचं बोलणं ऐकून बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली होती. “असं वाटतं की पुन्हा त्या वातावरणात जाऊन राहावं. आता मी समजू शकतो की तुम्ही परत का गेलात,” असं बिग बी म्हणाले. त्यानंतर त्यांनी नाना पाटेकरांना त्यांची गावातली त्यांची दिनचर्या कशी असते, ते विचारलं. त्यावर नाना म्हणाले, “मी सकाळी उठतो, तिकडे मी स्वतःचे एक जिम बनवले आहे. माझ्याकडे दोन गाई आणि एक बैल आहे. तिथे मीच सगळं काही करतो. नाश्ता, जेवण – माझं सगळं जेवण मीच बनवतो. मी खरंच चांगलं जेवण बनवतो.”
माझ्या गरजा खूपच साध्या आहेत – नाना पाटेकर
“कधी कधी तर मला वाटतं की, जर मी चित्रपटांमध्ये करिअर करू शकलो नसतो, तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते. पण, मी जितकी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा आयुष्याने मला खूप जास्त दिलंय. माझ्या गरजा अगदी साध्या आहेत. संध्याकाळी, माझ्या सोबतीला पुस्तकं असतात. काही मी वाचली आहेत, काही वाचलेली नाहीत. चार पाच कपाटं भरून पुस्तकं आहेत. शहरात आपल्याकडे भिंती असतात, माझ्या गावात डोंगर आहेत. मी डोंगरांमध्ये राहतो. तिथलं आयुष्य खूप सोपं आहे. तिथे अलार्मसाठी घड्याळ लागत नाही. सकाळी पक्षी मला उठवतात. आमच्याकडे कधीकधी मोरसुद्धा येतात,” असं नाना यांनी त्यांच्या गावाचं वर्णन करताना म्हटलं होतं.
तुमचंच घर समजून या आणि राहा – नाना पाटेकर
नाना पाटेकरांच्या गावाकडील गोष्टी ऐकून अमिताभ बच्चन भारावले आणि “कधी तरी तुमच्याकडे यायलाच हवं,” असं म्हणाले. नानादेखील उत्साहात “अर्थात. नक्की या. मी नेहमी माझ्या मित्रांना सांगतो की हे घर माझ्या एकट्याचे नाही. ते तुमचेही आहे. तुमचेच घर समजून या आणि राहा,” असं नाना बिग बींना म्हणाले होते.