सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळीबार केला होता. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत संशयित आरोपींना गुजरातमधून अटक केली होती. ४८ तासांच्या आत पोलिसांनी या आरोपींची ओळख पटवून त्यांना भुज येथून ताब्यात घेतलं. यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. सलमानच्या घराबाहेर या दोन आरोपींनी पाच फायर राऊंड केल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर

“आम्ही गुजरातमधील भुज जिल्ह्यातून विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन संशयितांना अटक केली आहे. या दोघांनी सलमानच्या घराची तीन वेळा रेकी केली. विकी गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) हे दोघे बिहारचे रहिवासी असून, रविवारी पहाटे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करून नंतर ते पसार झाले होते. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील ‘माता नो मध’ गावातून सोमवारी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली.” अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : Salman Khan Firing Case : पनवेलमध्ये वास्तव्य, वांद्र्यात रेकी आणि पोर्तुगालमधून धमकी, गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना मंगळवारी मुंबईत आणून दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात केलं होतं. गोळीबाराच्या घटनेमागील सूत्रधार ओळखण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेने या दोघांच्या कोठडीची मागणी केली. याप्रमाणे, न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. याशिवाय या हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

हेही वाचा : सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर पहाटे गोळीबार, पोलिसांनी सुरक्षा वाढवली

दरम्यान, वांद्रेमधील गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबाराची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरविणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय या सगळ्या प्रकरणावर आता खान कुटुंबीयांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. सलमानचा भाऊ अरबाजने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. “सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत. आमच्या सुरक्षेची त्यांच्याकडून पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल खूप आभार” असं त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.