हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत दमदार भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर मागच्या बऱ्याच काळापासून चित्रपट आणि अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. २०१० मध्ये त्या अखेरच्या चित्रपटात दिसल्या होत्या. आता तब्बल १३ वर्षांनंतर त्या ‘गुलमोहर’मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. पण आजही अभिनेत्रींसाठी खंबीर आणि चांगल्या भूमिका लिहिल्या जात नसल्याचं त्यांना दुःख वाटतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी बॉलिवूडमधील लिंगभेदावर मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी यावेळी अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर या कलाकारांच्या नावांचाही उल्लेख केला.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी बॉलिवूडमधील सद्यस्थिती आणि चित्रपटांतील भूमिका यावर आपलं मत मांडलं. यावेळी त्यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांचं कौतुकही केलं. त्या म्हणाल्या, “नीना गुप्ता ६३ वर्षांच्या आहेत आणि तरीही त्या आजही दमदार भूमिका साकारताना दिसतात. पण माझ्या वयाच्या अभिनेत्रींना या इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही भूमिका मिळणं फार कठीण आहे याचं दुःख वाटतं. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रींना तेवढ्या स्ट्रॉन्ग भूमिका मिळत नाहीत.”

आणखी वाचा- “या गोष्टी दिर्घकाळ…”, प्रभासला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर क्रिती सेनॉनने सोडलं मौन

शर्मिला टागोर या मुलाखतीत सांगतात, “आपण आजही थोड भेदभाव करतो खासकरून महिलांबरोबर कारण दमदार भूमिका नेहमीच पुरुषांना दिल्या जातात. जसं अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांच्यासारख्या अभिनेत्यांसाठी खास स्क्रिप्ट लिहिल्या जात आहेत. पण त्याच ठिकाणी वहिदा रहमान किंवा अन्य कोणत्याही वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रीसाठी असं काही केलं जात नाही. चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब असतं त्यामुळे चित्रपटाची कमाई जास्त महत्त्वाची असते. अर्थातच तुम्हाला प्रेक्षकांना खेचून आणायचं आहे. पण आधी अंडं येतं की कोंबडी? अशाप्रकारचा निर्णय इंडस्ट्रीच्या कॅप्टन्सना घेण्याची गरज आहे. पण गोष्टी बदलत आहेत. आता आणखी कमालीचे आणि समजदार कलाकार तयार होत आहेत.”

शर्मिला टागोर यांनी या मुलाखतीत नीना गुप्ता यांचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, “आता खूपच कमालीच्या काही अभिनेत्री आहेत जसं की नीना गुप्ता. त्यांच्या व्यतिरिक्त आणखीही काही कलाकार आहेत. ओटीटीवर तर अशाप्रकारच्या कलाकारांची संख्या जास्त आहे. थोडा वेळ लागेल पण ही परिस्थितीही कधीतरी बदलेल.”

आणखी वाचा- “त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह…”, राजामौलींना वादग्रस्त म्हणणाऱ्यांवर भडकली कंगना रणौत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शर्मिला टागोर यांच्या ‘गुलमोहर’ चित्रपटात मनोज बाजपेयीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तो शर्मिला टागोर यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एका कुटुंबाच्या कथेवर बेतला आहे. जो प्रत्येकाला स्वतःची कथा असल्यासारखं वाटेल. शर्मिला टागोर ‘गुलमोहर’मध्ये आजीची भूमिका साकारत आहेत. जी अचानक तिच्या पॉन्डेचरीमधील घरी जाऊन राहण्याचा निर्णय घेते आणि तिथून सगळा गोंधळ सुरू होतो. हा चित्रपट येत्या ३ मार्चला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.