आयपीएल २०२५ हे पर्व विराट कोहलीच्या सर्व चाहत्यांसाठी खास आहे. काल ४ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहा धावांनी पंजाब किंग्जवर मात केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळविलेल्या या विजेतेपदामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याचे कारण म्हणजे विराट कोहलीचा त्यामागे असलेला संयम आणि त्याची मेहनत. म्हणूनच त्याचे चाहते आरसीबीने यंदाचे आयपीएलचे विजेतेपद जिंकावे यासाठी प्रार्थना करीत होते. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालेल्या या यशासाठी विराट कोहली व त्याच्या संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कलाविश्वातील अनेकांनी सोशल मीडियामार्फत विराटला शुभेच्छा दिल्या. अभिनेता विकी कौशल व रणवीर सिंह यांनीसुद्धा विराटसाठी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत त्याला शुभेच्छा देत त्याचे कौतुक केले आहे. विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्टोरी पोस्ट करत म्हटले आहे, “विराटने आजवर क्रिकेटला त्याचं सर्वस्व दिलं आहे”. यावेळी त्याने त्याच्या ‘छावा’ चित्रपटातील गाजलेला संवाद लावल्याचंही ऐकायला मिळतं. तर दुसरीकडे रणवीर सिंहनेसुद्धा स्टोरीवर विराट कोहली व दक्षिण आफ्रिकेचा आणि आरसीबी संघाचा माजी क्रिकेटर ए.बी. डिव्हिलर्सचा फोटो ठेवला आहे. तर, पुढे संघाने मिळविलेल्या विजयानंतर विराटला मैदानात अश्रू अनावर झाल्याचा व्हिडीओ पोस्ट करीत ‘वन क्लब प्लेअर’ अशी कॅप्शन दिली आहे.

एकूणच विराट कोहली व आरसीबीने १७ वर्षांनी मिळवलेलं विजेतेपद पाहून केवळ खेळाडूंचाच नाही तर त्यांच्या चाहत्यांच्या आनंदही द्विगुणीत झाला आहे.१७ वर्ष एकाच संघाकडून खेळल्याने विराटचे त्याच्या संघाशी घट्ट नाते निर्माण झाले होते. परंतु, दरवर्षी काही ना काही गोष्टीची उणीव राहिल्याने त्याचा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरायचा. मात्र, काल त्याच्या १७ वर्षांच्या मेहनतीचं चीज झाले आणि त्याचे १७ वर्षांपासून अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
RCBच्या विजयानंतर अभिनेता विकी कौशल व रणवीर सिंहची विराट कोहलीसाठी स्टोरी

दरम्यान, आयपीएल २०२५ ची काल सांगता झाली. काल विजय मिळवल्यानंतर विराट कोहली त्याची बायको अभिनेत्री अनुष्का शर्माला मिठी मारताना दिसला. त्यादरम्यानचे त्यांच्या भेटीची दृश्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनुष्काने नवऱ्याला पाठिंबा देण्यासाठी आयपीएल २०२५ च्या बऱ्यापैकी सर्व सामन्यांना हजेरी लावली होती. अशातच आता आरसीबीने मिळविलेल्या यशानंतर सोशल मीडियावर याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. चाहत्यांसह कलाकार मंडळीदेखील त्यांच्या भावना व्यक्त करीत विजयी संघ आणि खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.