करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांचे १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. करिश्मा तिच्या दोन्ही मुलांसह त्यांच्या अंत्यसंस्काराला गेली होती. दोघांनी २००३ साली लग्न केलं होतं आणि २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. संजय कपूरशी लग्न करण्यापूर्वी करिश्मा बच्चन कुटुंबाची सून होणार होती, परंतु त्यांचं नातं अचानक तुटलं.
अभिषेक बच्चन व करिश्मा एकेकाळी बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल होते. दोघे पहिल्यांदा श्वेता बच्चनच्या लग्नात भेटले होते, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या. अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत जया बच्चन यांनी करिश्माला बच्चन कुटुंबाची सून म्हटलं होतं. त्यावेळी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली होती.
अभिषेक व करिश्माचं नातं अधिकृत झालं होतं, त्यांचा साखरपुडा झाला होता पण तो अचानक मोडला. दोघांचं पाच वर्षांचं नातं होतं. जानेवारी २००३ मध्ये साखरपुडा मोडल्यावर काही महिन्यांनी करिश्माने संजय कपूरशी लग्न केलं होतं. २००५ मध्ये अमिताभ बच्चन अभिषेक व करिश्माच्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल व्यक्त झाले होते. साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेकची अवस्था कशी झाली होती, तेही त्यांनी सांगितलं होतं.
असं कोणाबरोबरही घडू नये – अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये गेले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलाच्या ब्रेकअपचे कारण आणि करिश्माच्या लग्नाबद्दल वक्तव्य केले होते. “तो एक संवेदनशील क्षण होता. नाती बनतात, नाती तुटतात. हे कोणत्याही तरुणासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी देखील दुःखद असते. असं कोणाबरोबही घडू नये असं मला वाटतं. पण जर दोन व्यक्ती एकत्र यायला परिस्थिती चांगली नसेल, तर मग वेगळं होणं कधीही चांगलं. इथेही तेच झालं,” असं अमिताभ बच्चन म्हणाले होते.

मनासारखं झालं तर चांगलंच अन्…- अमिताभ बच्चन
करिश्मा व अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर कुटुंबाला काय सहन करावं लागलं, याबद्दल अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं. हा कुटुंबासाठी एक धडा होता, असं त्यांनी म्हटलं होतं. “मला वाटतं की एखाद्याच्या आयुष्यातील हे सर्व प्रसंग, घटना त्याला एक चांगला माणूस बनवतील, त्याला जगाला अधिक मजबूत पद्धतीने तोंड द्यायला शिकवतील. आपण पूर्णपणे प्रामाणिक असल्यास आपल्याला यातून अनेक गोष्टी शिकता येतात. आपल्या मनासारखं झालं तर चांगलंच आणि नाही झालं तर अधिक चांगलं. कारण ते देवाच्या मनासारखं असतं आणि देव तुमचं कधीच वाईट इच्छित नाही,” असं अमिताभ बच्चन म्हणाले होते.