हिंदी चित्रपटसृष्टीत बरेच धाडस प्रयोग आजवर आपण पाहिले आहेत. आजवर समलिंगी नातेसंबंधांवर भाष्य करणारे बरेच चित्रपट आले अन् प्रेक्षकांनी त्यांना उचलून धरलं. शबाना आजमी व नंदिता दास यांचा ‘फायर’, मनोज बाजपेयी यांचा ‘अलीगढ’, आयुष्मान खुरानाचा ‘शुभमंगल ज्यादा सावधान आणि राजकुमार रावचा ‘बधाई दो’सारख्या बऱ्याच चित्रपटातून समलैंगिकतेवर वेगवेगळ्या पद्धतीने भाष्य केलं आहे आणि प्रेक्षकांनी त्यांना उत्तम प्रतिसादही दिला आहे, पण तुम्हाला हे ठाऊक आहे का की बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि संजय दत्त या दोघांना घेऊनही अशीच एक गे लव्ह स्टोरी एकेकाळी लोकांसमोर येणार होती? आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.

यासाठी आपण थोडं मागे जाऊया. गेल्या काही दिवसांपासून शशी कपूर आणि राखी यांची प्रमुख भूमिका असलेल्या १९८१ सालच्या ‘बसेरा’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. रमेश तलवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं तर रमेश बेहल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. मीडिया रीपोर्टनुसार कार्तिक आर्यनचा आगामी ‘आशिकी ३’ हा चित्रपट जो ‘तू है आशिकी’ नावाने प्रदर्शित होणार आहे तो ‘बसेरा’चा रिमेक असणार आहे.

आणखी वाचा : ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

हे वृत्त बाहेर येताच ‘बसेरा’चे निर्माते रमेश बेहल यांनी ‘टी-सीरिज’ला कायदेशीर नोटिस पाठवली. टी-सीरिजने मात्र हा चित्रपट ‘बसेरा’चा रिमेक नसून असं कोणतंही कथानक आम्ही सादर करत नाही आहोत असं म्हणत त्यांच्यावर लागलेले आरोप खोडून काढले, पण नेमका ‘आशिकी ३’ हा चित्रपट कशाचा रिमेक असणार आहे याबद्दल त्यांनी खुलासा केलेला नाही. पण ‘बसेरा’ या चित्रपटाचा रिमेक होण्याच्या वावड्या उठण्याची ही काही पाहिली वेळ नाही. याआधीही एका बड्या निर्मात्याने या कथेला हात घालायचा प्रयत्न केला होता.

‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गुलाल’सारख्या सुपरहीट चित्रपटांचे निर्माते झामू सुगंध यांनी ९० च्या दशकात एका चित्रपटाची घोषणा केली होती. ‘साजन जी घर आये’ हे या चित्रपटाचं नाव होतं. आपल्या या चित्रपटात झामू यांनी ‘बसेरा’ची कथा घेऊन एक सर्वात मोठा बदल करायचं ठरवलं होतं. ‘बसेरा’ची कहाणी थोडक्यात सांगायची तर, शशी कपूर आणि राखी यांना या चित्रपटात विवाहित जोडपं म्हणून दाखवलं होतं, यात राखी यांच्या बहिणीची भूमिका रेखा यांनी केली होती. यात रेखा यांच्या पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून राखी ही पायऱ्यांवरुन खाली कोसळते, अन् या अपघातात तिची मानसिक स्थिती बिघडते. नंतर रेखा आणि शशी कपूर यांचं पात्र एकमेकांशी लग्नगाठ बांधतं. १४ वर्षांनी पुन्हा एका अपघातामध्ये राखी यांची मानसिक स्थिति सुधारते आणि त्या पुन्हा घरी शशी यांच्याबरोबर १४ वर्षांपूर्वीचं तेच नातं पुढे नेण्याचा प्रयत्न करते.

आणखी वाचा : ‘हे’ आहे रणबीर कपूरचं सीक्रेट सोशल मीडिया अकाऊंट; फोटो शेअर करत नेटकऱ्याचा मोठा खुलासा

‘लल्लनटॉप’ या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार झामू सुगंध ‘बसेरा’च्या या कथेमध्ये एक मोठा बदल करणार होते. शशी कपूर यांच्या ऐवजी झामू चित्रपटात संजय दत्तला घेणार होते तर कथेतील रेखा यांच्या पात्राला पुरुष पात्र बनवून त्या भूमिकेसाठी त्यांनी सलमान खानला घ्यायचा विचार केला होता. सलमानची भूमिका एका सायको लव्हरची असणार होती. पण सलमान खानचं प्रेम नक्की संजय दत्तवर असणार होतं की आणखी कोणावर याबद्दल मात्र स्पष्टीकरण झामू यांनी दिलेलं नव्हतं. जर झामू यांनी कथेत बाकी बदल केले नसते तर या रिमेकमध्ये संजय दत्त व सलमान खान यांना एक गे कपल म्हणून पाहायला मिळालं असतं.

या चित्रपटासाठी सलमान खान व संजय दत्त यांनी होकारही दिला होता. परंतु या दोघांच्या तारखा जुळत नसल्याने झामू यांनी हा चित्रपट बाजूला ठेवला. याऐवजी त्यांनी संजय दत्त आणि उर्मिला मातोंडकर यांना घेऊन ‘खूबसूरत’ या चित्रपटावर काम सुरू केलं. १९९९ साल उजाडलं, ‘खूबसूरत’ प्रदर्शित झाला पण झामू सुगंध यांचा ‘साजन जी घर आये’ आणखीनच लांबणीवर पडला. त्यानंतर हा चित्रपट कधीच रुळावर आला नाही अन् अखेर झामू यांनी ही कथा डब्बाबंद केली.