१९८७ मध्ये आलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने अनिल कपूर आणि श्रीदेवी, तसेच बोनी कपूर यांचे नशीब बदलले. अनिल कपूर आणि बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ बनविण्यासाठी त्यांच्या घरातील सर्व पैसे पणाला लावले होते.
त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांपेक्षा ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट थोडा वेगळा होता. एका नायकाची कथा- जो गायब होऊ शकतो. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. हा असा चित्रपट होता की, ज्यामध्ये नायकापेक्षा खलनायकाला जास्त लोकप्रियता मिळाली. नायकापेक्षा खलनायकाच्या पोशाखावर जास्त पैसे खर्च करण्यात आले.
अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’मध्ये खलनायक मोगॅम्बोची भूमिका साकारणारे अमरीश पुरी थोडे नाट्यमय आणि भयानक दिसले. दिग्दर्शक शेखर कपूर मोगॅम्बोला वेगळ्या पद्धतीने सादर करू इच्छित होते. त्यांच्या लूकपासून ते त्यांच्या आउटफिटपर्यंत सर्व गोष्टींवर काम करण्यात आले.
एक लूक तयार करण्यात आला, त्यांचे केस अशा प्रकारे स्टाईल करण्यात आले की, त्यांच्या कपाळावरील डिझाइन दिसत असे. त्यांचा पोशाख काळ्या आणि सोनेरी रंगांनी तयार करण्यात आला होता. खांद्यावर पेंडेंट होते. ब्लेझर स्टाईल लांब ओव्हरकोट आणि उत्तम बूट. त्यावेळी या आउटफिटवर २५ हजारांहून अधिक खर्च आला होता, जो आजच्या काळात सुमारे दोन लाखांच्या बरोबरीचा आहे. निर्माते बोनी कपूर यांनी चित्रपटावर खूप खर्च केला.
सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना ‘मिस्टर इंडिया’ मध्ये कास्ट करण्याची चर्चा होती; पण त्यावेळी सुपरस्टार राजकारणात सामील झाले होते आणि कमी चित्रपट करत होते. अशा परिस्थितीत मुख्य नायकाची भूमिका अनिल कपूरकडे गेली. अनुपम खेर हे मोगॅम्बोसाठी पहिली पसंती होते. अभिनेत्याने स्वतः पुष्टी केली होती की, ते अमरीश पुरीपेक्षा चांगले काम करू शकत नाहीत. हा एक संस्मरणीय चित्रपट होता.
‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटामध्ये अनिल कपूरने अरुणची भूमिका साकारली होती. हा एक सुपरहीरो चित्रपट होता आणि तोपर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीत अशा प्रकारचा प्रयोग झाला नव्हता. हा चित्रपट प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यावेळी त्याने सुमारे १० कोटी रुपये कमावले.