बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानचं मुंबईत ‘तोरी’ नावाचं प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. काही दिवसांपुर्वी रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर दिलं जात असल्याचे अनेक वृत्त समोर आले होते. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या पनीरला ‘बनावट’ म्हटलं होतं. ज्याची बरीच चर्चा झाली होती. युट्यूबर सार्थकने ‘तोरी’ रेस्टॉरंटला भेट दिली होती.

त्याने व्हिडीओ शेअर करत आरोप केला होता की, रेस्टॉरंटमध्ये स्टार्चने बनवलेले पनीर दिले जात आहे. तसंच त्याने पनीरच्या तुकड्यांवर आयोडीनची टेस्ट केली होती. यानंतर आयोडीनचा स्पर्श होताच पनीर काळे-निळे झाले. रंग बदलताना पाहून सार्थक म्हणाला होता, “शाहरुख खानच्या रेस्टॉरंटमधील पनीर बनावट होते. हे पाहून मला धक्काच बसला.”

सार्थकने केलेल्या ‘बनावट’ पनीरच्या आरोपानंतर वाद निर्माण झाला होता. यावेळी रेस्टॉरंटकडून एक निवेदनाद्वारे दावे फेटाळून लावण्यात आले होते. अशातच आता ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत, रेस्टॉरंटचे मुख्य शेफ स्टीफन गडित यांनी बनावट पनीर प्रकरणाबद्दल सांगितलं आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणामुळे रेस्टॉरंटला फायदा झाल्याचंही ते म्हणाले.

मुलाखतीदरम्यान स्टीफन गडित म्हणाले, “जेव्हा आपण निराधार गोष्टींकडे बोट दाखवतो; तेव्हा नकळत त्याचा परिणाम होतो. गुणवत्ता आणि आम्ही पुरवत असलेले सर्वकाही उच्च दर्जाचे आहे. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नव्हती. अन्नशास्त्र आणि विज्ञानात एखाद्या प्रयोग करण्यासाठी चार वर्षे लागतात. फक्त काहीतरी ओतून होत नाही. त्याने (सार्थक) जे केलं; ते चांगल्या हेतूनेच केलं. त्याला फक्त ते तपासायचं होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर ‘बनावट’ पनीरच्या आरोपांमुळे रेस्टॉरंटच्या व्यवसायावर परिणाम झाला का? असे विचारले असता स्टीफन यांनी सांगितलं, “हो निश्चित. यामुळे आमचा व्यवसाय वाढला. आम्हाला इन्स्टाग्रामवर अधिक फॉलोअर्स मिळाले. त्यामुळे ते माझ्यासाठी एक वरदान होते असंच मी म्हणेन.” यापुढे त्यांनी सांगितलं, “एक व्यवस्थापक म्हणून आम्हाला विश्वास आहे की, काय चालले आहे ते समजून घेण्याइतके लोक हुशार आहेत.”