प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे काल (२६ फेब्रुवारीला) निधन झाले. ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली. पंकज उधास यांच्या मागे पत्नी फरीदा व मुली नायब व रेवा असा परिवार आहे

पंकज उधास यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज २७ फेब्रुवारीला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराअगोदर काही वेळ त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. कलाकारांसह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पंकज उधास यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर मुंबईतील वरळी हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराआधी मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. पंकज उधास यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

आपल्या आवाजाने पंकज उधास य़ांनी चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आहत’ नावाच्या अल्बमच्या माध्यमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘मुकरार’, ‘तरन्नम’, ‘मेहफिल’, ‘और आहिस्ता कीजिए बातें’, ‘ना कजरे की धार’, ‘चांदी जैसा रंग है तेरा’, ‘मत कर इतना गुरुर’, ‘आज फिर तुम पर प्यार आया है’, अशी त्यांची गाणी खूप गाजली.

हेही वाचा- दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई वयाच्या पन्नाशीत देणार बाळाला जन्म, पुढच्या महिन्यात पाळणा हलणार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकज उधास यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. ‘चिठ्ठी आयी है’ या गाण्यामुळे पंकज उधास यांना खरी ओळख मिळाली. गझलसम्राट म्हणून त्यांना जगभरात ओळखले जायचे. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना २००६ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.