हिंदी चित्रपटसृष्टीत सलीम खान यांची ओळख केवळ सलमान खानचे वडील अशी नाही तर एक प्रसिद्ध लेखक अशीही आहे. बॉलीवूडचे अनेक कलाकार स्टार होण्याचं श्रेय सलीम खान यांना जातं. जावेद अख्तर- सलीम खान ही एकेकाळची सर्वात गाजलेली जोडी होती.
अनेक हिंदी चित्रपटांच्या स्क्रिप्ट या जोडीने लिहिल्या आहेत. पण, एक वेळ अशी आली की ही प्रसिद्ध जोडी वेगळी झाली होती. याचदरम्यान काही रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चन यांच्यामुळे सलीम-जावेद ही जोडी वेगळी झाली होती. पण, हे खरोखरच असे होते का? जावेद अख्तर यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सत्य सांगितले आणि खुलासा केला की, सलीम आणि जावेद अख्तर यांची जोडी तुटल्यानंतर त्यांनी १० वर्षे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर कोणताही चित्रपट केला नाही.
सलीम खान आणि जावेद अख्तर ही ७० च्या दशकातील सुपरहिट जोडी होती. या जोडीने अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’सारख्या चित्रपटांसाठी लेखन करत प्रेक्षकांमध्ये त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ अशी ओळख मिळवून दिली. याशिवाय, सलीम-जावेद यांनी इतर अनेक चित्रपटांचे डायलॉग आणि पटकथा लिहिल्या ज्या हिट झाल्या.
जावेद अख्तर यांनी ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्ही वेगळे होण्यापूर्वी दोघांनी मिळून ‘मिस्टर इंडिया’ नावाच्या चित्रपटाची संकल्पना तयार केली होती. पण, गोष्टी पुढे जाण्यापूर्वीच यांची जोडी तुटली, म्हणूनच जावेद अख्तर यांनी स्वतः ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाचे डायलॉग, स्क्रिप्ट आणि स्क्रीनप्ले लिहिले. नंतर हा चित्रपट अनिल कपूरबरोबर बनवण्यात आला.
जावेद अख्तर म्हणाले, ‘आम्ही १९८२ मध्ये वेगळे झालो, ती तारीख होती २१ जून. सलीम साहेब माझ्या घरी आले. आमचा संवाद तिथेच झाला. आम्हला वेगळे होण्यापूर्वीच ”मिस्टर इंडिया’ची कल्पना सुचली होती. आम्ही वेगळे झालो तेव्हा परिस्थिती बदलली. अमिताभ बच्चन यांच्याशी असलेल्या माझ्या जवळीकतेमुळे अनेकांना वाटले की मी सलीम खान यांच्याशी असलेले संबंध तोडले आहेत.
अफवांमुळे १० वर्षे अमिताभ यांच्याबरोबर काम केले नाही
जावेद अख्तर पुढे म्हणाले, ‘या अफवांमुळे मी जवळजवळ १० वर्षे अमिताभ यांच्याबरोबर कोणताही चित्रपट केला नाही. मला खूप ऑफर्स आल्या, पण मी त्यापैकी एकही स्वीकारली नाही. सलीमपासून वेगळे झाल्यानंतर, अमिताभबरोबर मी केलेला पहिला चित्रपट ‘आझाद’ होता.
त्यानंतर जावेद अख्तर म्हणाले की, सलीम खान त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असल्याने ते नेहमीच त्यांचा आदर करायचे. पण, स्क्रीनप्ले लिहिताना दोघांनीही एकमेकांना समान मानले.