Ahmedabad Plane Crash : १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर एआय-१७१ या विमानाचा मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. तसंच वसतिगृहातील ३० जणांनाही आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर देशभरातून विविध स्तरातून दु:खद प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक बॉलीवूड आणि मराठी कलाकारांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
अशातच मराठी अभिनेते किरण माने यांनी या विमान अपघातासंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या पोस्टमध्ये ते असं म्हणतात, “सहा महिन्यापुर्वी अदानी समूहानने विमान सेवेत प्रवेश केला आहे. ‘एअर वर्क्स’ नावाची विमान देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल कंपनी विकत घेऊन त्यांनी ही सुरूवात केली. नॅरो-बॉडी आणि टर्बोप्रॉप विमानांची देखभाल, दुरूस्ती सेवा करणारी ही भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे. भारतातल्या हेलिकॉप्टरचीसुद्धा देखभाल करण्याचं काम या कंपनीकडे आहे.”
यापुढे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, “बोइंग ७३७ फॅमिलीच्या विमानांनासुद्धा ही कंपनी सेवा देते. पण परवा अपघात झालेले बोइंग ७८७ ड्रीमलाइनर, जे एक विशालकाय विमान आहे, तशा विमानांच्या देखभालीची कामं करण्याचं कंत्राट अजून अदानी समुहाच्या या कंपनीला मिळालेलं नाही. तिथं तगडी स्पर्धा आहे. अहमदाबादला अपघात झालेल्या बोइंग ७८७ ड्रीमलाइनरसारख्या मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या विमानांची देखभाल सेवा देण्याचं मोठं कंत्राट ‘एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेड’ या कंपनीकडं पुर्वीपासून आहे.”
पुढे किरण मानेंनी म्हटलं, “सेवा देऊन आपला व्यवसाय आणि कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी जीएमआर एरोटेक्निकसारखी कंपनी अदानी समुहाच्या स्पर्धेत आहे. तसेच या क्षेत्रात इंडिगो, टाटा ग्रुप हे ही कार्यरत आहेत. हल्ली विमानाचा अपघात कसा झाला यावर खुप लोक बोलत आहेत. विमानातील तांत्रिक बिघाडामुळं हा अपघात झाला असं आजवरच्या बातम्यांमधून समोर येतंय.”
यापुढे किरण मानेंनी म्हटलं, “या विमानांचा मेन्टेनन्स (देखभाल) कोण करतं? ती जबाबदारी कुणाची असते? त्यांच्याकडून काय कमी राहिली? याबाबतीत संबंधित कंपन्यांना जाब का विचारला जात नाही? याबद्दल काहीच समोर येत नाही. म्हणून थोडं खोलात जाऊन मला जमेल तेवढं सत्यशोधन केलं.”
पुढे किरण माने म्हणतात, “आपली निष्पाप माणसं दिवसेंदिवस हकनाक मारली जात आहेत; म्हणून आपण सगळेच अस्वस्थ आहोत. मुद्याचं कुणीच बोलत नाही, म्हणून आपली घुसमट वाढत चालली आहे. ‘पायलट शेवटच्या क्षणी काय बोलला?’, ‘शेवटचा सेल्फी कुणी कसा काढला?’ हे सगळं ठीक आहे. पण आपण यापुढं कधी जाणार?”
यानंतर त्यांनी “मी चुकीचा असेन तर कुणी आणखी तज्ज्ञ आणि ज्ञानी माणसाने यावर आणखी सखोलपणे प्रकाशझोत टाकल्यास ही अपघाताच्या मुळाशी जाण्यापासून दूर चाललेली चर्चा योग्य त्या पॉवरने ‘टेकऑफ’ घेईल अशी आशा आहे” असं म्हटलं आहे. किरण मानेंच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या दुर्घटनाग्रस्त विमानातून फक्त एकमेव प्रवासी चमत्कारिक रित्या बचावला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं टाटा समूहाने सांगितलं आहे. टाटा ग्रुपने जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या मदतीव्यतिरिक्त, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना विमा कंपन्यांकडून सुमारे १.५ कोटी रुपयांची भरपाई मिळणार असल्याचं वृत्त आहे