मराठी कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे क्षितीज झारापकर यांचं रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास निधन झालं. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. वैयक्तिक आयुष्यात ते गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाचा सामना करत होते.

गेल्या काही दिवसांपासून क्षितीज झारापकर कर्करोगावर उपचार घेत होते. परंतु, मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डरमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे पार्थिव दादर येथील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर साडेतीन वाजत्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

हेही वाचा : मोठा चष्मा, वयस्कर लूक अन्…; ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? चित्रपटसृष्टीत २० वर्षे गाजवतेय अधिराज्य

क्षितीज झारापकर यांच्या निधनावर आता मराठी कलाविश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. “काय यार तू खूपच घाई केली. क्षितीज झारापकर आपली किती वर्षांची ओळख आणि दोस्ती… काम करण्यापासून ते माझ्या फिल्मचं दिग्दर्शन एवढा प्रवास…वाईट वाटलं. सुप्रियाचा फोन आला खरं वाटलं नाही ऐकून…@shreeranga deshmukh…ने सांगितलं तेव्हा मन सुन्न झालं…हुशार तर तू होतास…मी बाहेर आहे. आपली शेवटची भेट पण नाही होणार…काय बोलू यार…तुझ्या कुटुंबालाबळ ईश्वर देवो…जीवन अस कसं संपू शकतं…ओम शांती…अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : Video : अकायच्या जन्मानंतर पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आली अनुष्का शर्मा! विराट कोहली बाद झाल्यावर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

क्षितीज झारापकरच्या यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी यापूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘सख्खे शेजारी’, ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकांमध्ये काम केलं होतं. अलीकडेच ते आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘चर्चा तर होणारच’ या नाटकात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.

हेही वाचा : हृदयविकाराचा झटका कशामुळे आला? श्रेयस तळपदे म्हणाला, “करोनाची लस घेतल्यावर…”

याशिवाय ‘गोळा बेरीज’, ‘ठेंगा’, ‘एकुलती एक’, ‘आयडियाची कल्पना’, ‘बालगंधर्व’, ‘बायकोच्या नकळत’ या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. ‘आभाळमाया’, ‘दामिनी’, ‘बेधुंद मनाची लहर’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. सध्या सगळेच मराठी कलाकार क्षितीज यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.