Kedar Shinde On Hindi Language Controversy : राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे. म्हणजेच, पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती रद्द केली असली तरी पाचवीपर्यंत हिंदी ही ‘तिसरी भाषा’ म्हणून शिकणं बंधनकारक राहणार आहे.
हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर २० हून अधिक विद्यार्थी इच्छुक हवेत, अशी माहिती देण्यात आली आहे. याविरोधात आता जनतेतून संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
हेमंत ढोमे, सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित यांसारख्या मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत हिंदी सक्तीला जाहीर विरोध करत आपली स्पष्ट मतं सोशल मीडियावर मांडली आहेत.
शाळेतील हिंदी भाषा सक्तीवर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पहिली ते चौथीच्या बाळांना मनाप्रमाणे जगू द्या, त्यांना Confuse करू नका” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
केदार शिंदे पोस्ट शेअर करत म्हणतात, “ठेच लागल्यावर “आई गं!” म्हणायचं की, “ओ मेरी माँ…” यात पहिली ते चौथीच्या बाळांना Confuse करू नका…त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या! हिंदी सक्ती नकोच…जय महाराष्ट्र”
दरम्यान, हिंदी भाषा सक्तीबद्दलच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आधीपासूनच आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी २६ जून रोजी पत्रकार परिषद घेत हिंदीसक्ती विरोधात मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती तिने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली आहे.